
Mumbai News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी मुंबईतील रस्त्यांच्या कामावरून उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांच्याच मतदारसंघातील कामाचे उदाहरण देत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला गालबोट लागेल, अशी आजची स्थिती असल्याचे परखड मत मांडले. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील आमदारांनीही मुंबईतील रस्त्यांच्या कामावर प्रचंड नाराजी व्यक्त केली.
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबईतील सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामावरून प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मात्र, या कामामध्ये अनेक ठिकाणी निकृष्ठ स्वरुपाचे काम झाले. काम रेंगाळले. यंत्रणा काहीच काम करत नव्हती, असे भातकळकर म्हणाले.
त्यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याला कुठेही गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सामंत म्हणाले. सामंत यांच्या या उत्तरानंतर अध्यक्ष नार्वेकरांनी नाराजीचा सूरात आपली भूमिका मांडली. मला या विषयात बोलायचे नव्हते, पण मला बोलावे लागेल, असे सुरुवातीलाच नार्वेकर म्हणाले.
माझ्या मतदारसंघात दोन-अडीच वर्षांपूर्वी पहिले टेंडर निघाले. कंत्राटदाराने काहीही काम केले नाही. सहा महिन्यांपूर्वी पुन्हा टेंडर काढले. अजूनही काम सुरू झाले नाही. ज्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून काढलेले, त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कारणे दाखवा नोटीस दिली आहे, दंड आकारला आहे. दंड वसूल करण्यासाठी महापालिकेने कोणतीही कारवाई केलेली नाही, असे अध्यक्षांनी सांगितले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची संकल्पना अत्यंत चांगली आहे. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी हे रस्ते बांधण्यात येत होते. पंरतु, प्रशासनाकडून ज्याप्रकारची कारवाई होत आहे, ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला निश्चितपणे गालबोट लागेल, अशी परिस्थिती आज आहे, अशी भावना नार्वेकरांनी व्यक्त केली.
दरम्यान, भाजपचे आमदार अमित साटम यांनीही कामांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेल्या रस्त्याचे काम अजूनही सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव अमित साटम यांनी मांडले. नाकीनऊ आले आहे. अख्खी मुंबई खोदून ठेवली आहे. मुंबईकरांची क्वालिटी ऑफ लाईफ काय आहे, असा सवालही त्यांनी केला. त्यानंतर अमित देशमुख, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांनीही रस्त्यांच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केले. अध्यक्षांनी शेवट सोमवारी दुपारी तीन वाजता त्यांच्य दालनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य उपस्थितीत मुंबईतील आमदारांची बैठक होईल, असे जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.