Sharad Pawar And Devendra Fadnavis : राज्यात सत्तांतर झाल्यापासून महाविकास आघाडी व शिंदे फडणवीस सरकारमध्ये वारंवार कुरघोडीचं राजकारण सुरु आहे. तसेच विरोधकांकडून सरकारच्या कार्यशैली व धोरणांवर देखील सातत्याने टीका करण्यात येत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सुध्दा शिंदे सरकारवर हल्लाबोल करत असतात.
सध्या आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं असतानाच पुण्यात रविवारी (दि.८) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकाच गाडीतून प्रवास केला होता. यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच आता ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, शरद पवार राज्याचेच नव्हे तर देशाचे महत्त्वाचे आणि मोठे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत प्रवास केला. हे कटुता संपविण्याचं पहिलं पाऊल असणार आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार यांच्यासोबत फार काळ कटुता ठेवता येणं शक्य नाही असेही राऊत यावेळी म्हणाले.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीकेचे आसूड ओढताना संजय राऊत म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करून पाडले. त्यानंतर भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आणणं, आमदार खासदार फोडणं. पक्ष फोडणं हे सगळं बेकायदेशीर आहे.
मात्र, यानंतर उद्धव ठाकरे गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे दारे ठोठावली. त्यावर आता सुनावणी सुरू आहे. शिंदे सरकारवर न्यायालयात तारखावर तारखा पडत असल्या तरी राज्यातील जनतेसह आम्ही न्यायालयाकडं अपेक्षेनं पाहत आहोत. शिंदे- फडणवीस सरकार घटनाबाह्य सरकार सत्तेवर एक दिवसही राहता कामा नये, असा आदेशच कोर्टाने द्यायला हवा असंही राऊत यांनी सांगितलं आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.