Eknath Shinde comments on post of Chief Minister : राज्यातील महासत्तांतराबाबत आजही राज्यातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले. शिंदे गटापेक्षा भाजपकडे जास्त संख्याबळ असतानाही एकनाथ शिंदेंना भाजपने (BJP) मुख्यमंत्रीपद कसं दिलं, असाही प्रश्न जनतेच्या मनात आजही उपस्थित होत असतो. आता याच प्रश्नाचं उत्तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहे. आपण मुख्यमंत्री होणार हे तुम्हाला आधीच माहिती होतं का, असा सवाल त्यांना विचारल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदासाठी हे सर्व केलेलं नाही. मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही हा उठाव केला नाही. २०१९ मध्ये जनतेने भाजप-शिवसेनेच्या युतीला कौल दिला होता.
भाजपसोबतच सत्ता स्थापन करायला हवी होती. त्यासाठी आम्ही प्रयत्नही केला, दुर्दैवाने तसं झालं नाही. आम्ही खुप प्रयत्न केले. त्याच्यात आम्हाला यश मिळालं नाही. पण राज्यात विरोधी विचारांच्या पक्षासोबत शिवसेनेने सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीत आमची वैचारिक कोंडी झाली. पण कॅबिनेट मध्ये कसे निर्णय व्हायचे हे अशोक चव्हाण यांना विचारा, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यातील नेते एकमेकांबद्दल ज्या पातळीवर जाऊन बोलत आहेत त्याचा समाजावर आणि राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांवर काय परिणाम होत असेल. याचा तुम्ही काही विचार केलाय का, असाही सवाल त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, हो हे बरोबर आहे शेवटी आपण लोकप्रतिनीधी आहोत. आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृती सोडून बोलता कामा नये. एक पातळी ठेऊनच सर्वांनी बोललं पाहिजे. आम्ही सत्तेत आल्या आल्या सर्वातं आधी दहीहंडी आणि सण उत्सवांवरील निर्बंध हटवले. समाजातील नकारात्मकता दुर करण्यासाठी या सणांवरील सर्व निर्बंध हटवले. यातून लोकांमध्ये एक सकारात्मकता आली, नुसतं घरामध्ये बसुन चालत नाही.
अनेकदा अनेकांच्या तोंडून खालच्या पातळीचे आरोप झाले, पण माझ्या तोंडून तुम्ही कधी ऐकलं का, असा प्रतिप्रश्नही मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच, तुम्ही आरोप करत रहा, मी काम करत राहिलं असंच मी त्यांना म्हणत असतो. शेवटी तरुण पिढीसुद्धा आपलचं अनुकरण करणार आहे. त्यामुळे बोलताना प्रत्येकाने काहीतरी जाणीव ठेवली पाहिजे. असंही एकनात शिंदेंनी यावेळी नमुद केलं.
प्रत्येकाला माहिती असतं आपण जाणीवपुर्वक बोललं पाहिजे, पण काहीतरी वादग्रस्त बोलल्याशिवाय माध्यमं आपली दखल घेत नाहीत. हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे हे सर्व जाणीवपुर्वक होतंय. पण ते एखाद्यावर बंधन घालून हे सर्व होणार नाही. प्रत्येकाने आत्मपरिक्षण केलं पाहिजे. आपण चांगलं बोलतोय की वाईट, हे आपणच आपल्या सद्सदविवेक बुद्धीला विचारलं पाहिजे. लोकांना हे आवडत नाही. आम्ही आरोपांना कामाने उत्तरे देतोय, त्यामुळेच तर ग्रामपंचात निवडणुकीत आम्हाला दीड हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायती मिळाल्या. याचा मला अभिमान आहे. लोकांनी सपोर्ट केलाय. पण बोलणाऱ्यांना हे समजलं पाहिजे. मी जसं बोलतो, तुम्ही आरोप करा, आम्ही कामाने उत्तर देऊ, हे सर्वांना समजलं तर असं बोलणही आपोआप बंद होईल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.