

Thane, 02 February : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा विषया सध्या चर्चिला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलिनीकरणाची चर्चा फेटाळल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विलिनीकरण होणार होतं, हे दोन हजार टक्के खरं आहे, असे म्हटले आहे. तसेच, काही गोष्टी गुप्त असतात, त्या कुठे झाल्या, कशा झाल्या, त्यात काय बोलणं झालं, हे सर्व उघड करणं योग्य नसतं, असे सांगून आव्हाडांनी विलिनीकरणाच्या मुद्यावर जादा बोलणं टाळलं.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, माझं आणि अजितदादांचं शेवटचं बोलणं झालं, त्यात ते म्हणाले होते, ‘जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव. सगळी काही व्यवस्थित करून देईन.’ यावर लोकांना काय चर्चा करायची आहे ती करू द्या. मी या चर्चेत मुद्दामहून लांब राहिलो होतो. मला कोणत्याही वादात पडायचं नव्हतं. ह्या असल्या वादात पडायचं, काही अर्थ नाही.
एक माणूस गेल्यानंतर तो बोलला होता. बोलला नव्हता, काय माहिती तो बोलला होता की नव्हता. ही चर्चा करणं हे नैतिकतेला धरून नाही. तो माणूस गेल्यावर त्यावर आपण काय बोलू शकतो. मी गेली काही महिन्यांपासून शांत बसून आहे. त्याची काही कारणं आहेत. माझा बाप (ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना उद्देशून) जो निर्णय घेईल, तो घेईल. आपला ठरलेला निर्णय आहे, बाप जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमदार आव्हाड म्हणाले, अजितदादांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालं आहे. अजितदादांइतका तडकाफडकी निर्णय घेणारा मोठा नेता मी तर गेल्या ४० वर्षांत पाहिलेला नाही. त्यांची दृष्टी आणि निर्णयक्षमतेबाबत त्यांची तुलनाच करता येणार नाही, अशी होती. प्रशासनावर इतकी जबरदस्त पकड असणारा, सर्वच समाजावर हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा, असा नेता होणे नाही.
निर्णय घेण्याबाबत अजितदादांचा हातच कोणी पकडू शकत नाही. एकदा टीव्हीवर माझा आणि एकनाथ खडसे यांचा वाद सुरू असताना ते मला म्हणाले, अजितदादा यांनी अवघ्या तीन दिवसांत फाईल क्लिअर केली होती. त्यावर मी म्हटलं, ‘तीन दिवसांत केली? अजितदादा कुठे तरी चुकलेले दिसताहेत. या फायलीवर त्यांनी तीन तासांत सही करायला पाहिजे होती.’ फाईलींचा निपटारा ते अत्यंत वेगाने करायचे. फाईली थांबल्या आहेत, असं मंत्रालयात अजितदादांच्या बाबत कधी घडलंच नाही, असा अनुभवही आव्हाड यांनी सांगितला.
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरचा आहे. तो माझ्या किंवा नजीब मुल्ला अथवा आनंद परांजपे यांच्या पातळीवरचा नाही. त्यामुळे विलिनीकरणाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे, त्यामुळे ठाण्यात त्याबाबत चर्चा करणे संयुक्तिक ठरणार नाही, असेही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाचा विषय हा वरच्या पातळीवर सोडवावा. मला काय माहिती आहे, हे सांगणं माझ्या स्वभावात बसत नाही. मी ते बोलणार नाही. पण, विलिनीकरण होणार होतं, हे दोन हजार टक्के सत्य आहे. यावर कोणचं काय मत आहे, यावर चर्चा करणं मला योग्य वाटत नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे दावे खोडून काढताना विलिनीकरणासंदर्भातील चर्चा फेटाळली आहे. त्यावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती, हे दोन हजार टक्के सत्य आहे, असा दावा आमदार आव्हाड यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.