
Devendra Fadnavis on disqualified Ladki Bahin Yojana beneficiaries : महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय ठरलेली आणि विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली महायुती सरकारला सत्तेत बसवणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. मात्र आता या योजनेवरून बराच गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. राजकीय वर्तुळातूनही याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींच्या मते ही योजना बंद होणार आहे. तर काहींच्या मते सरकार अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार आहे. मात्र या सगळ्या चर्चांवर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवाय, शिवभोजन थाळी आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनांबाबतही मुख्यमंत्री फडणवीस बोलले आहेत. ते सकाळ सन्मान सोहळ्यात उपस्थित होते, यावेळी त्यांची विशेष मुलाखत घेतली गेली.
पॉप्युलर योजनांमुळे महाराष्ट्राचं आर्थिक गणित बिघडलं आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीसांनी(Devendra Fadnavis) सरकारची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, ''हे गणित काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे बिघडलेलं नाही. हे खरं आहे की ही योजना आम्ही सुरू केल्यानंतर एकदम 40-45 कोटींचा भार बजेटवर आल्यामुळे काही प्रमाणाता आमची फिस्कल स्पेस कमी झालेलीच आहे किंवा एकप्रकराचा ताण बजेटवर येणार आहे. पण आता ज्या काही बातम्या सुरू आहेत, की आता सगळ्या योजना बंद करून टाकणार वैगेरे.. पण असं काहीही बंद केलेलं नाही आणि काहीही बंद करायचं कारणही नाही. ज्या योजना सुरू आहेत, त्या सगळ्या योजना आम्ही चालवणार आहोत.''
''कुठल्याही परिस्थितीत आपली महसूली तूट वाढते आहे, म्हणून आपण भांडवली खर्च कमी करायचा या जाळ्यात आपण जायचं नाही. त्यामुळे आम्ही काही झालं तरी भांडवली खर्च कमी करणार नाही. भांडवली खर्च हा तेवढाच ठेवू, पुढील तीन-चार वर्षे आमच्या बजेटवर ताण असणार आहे पण आम्ही तो व्यवस्थापित करू.'' असं मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी सांगितलं.
तर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आणि शिवभोजन थाळी, या लोकप्रिय योजना बंद करण्याचा सरकारचा काही विचार आहे का? यावर बोलताना फडणवीसांनी सांगितले की, ''या योजना बंद करण्याचं कुठलही कारण नाही. उलट कालपरवाच तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत अनेक ट्रेन गेल्या बौद्धगया, अयोध्येला ट्रेन गेल्या आणि इकडे बातम्या छापून येतात की बंद झाली बंद झाली. असं काही बंद करण्याचं कारण नाही. शिवभोजन थाळी देखील आम्ही बंद करणार नाही. त्यामुळे या दोन्ही योजना बंद झाल्या वैगेरे ही चुकीची माहिती आहे. त्या योजना आम्ही चालवणार आहोत.''
याशिवाय, ''एकदा या सगळ्या योजनांसंदर्भात आढावा मात्र आम्ही घेणार आहोत. आता लाडकी बहीण योजनेत असं लक्षात आलं आहे की अनेक अपात्र बहिणींनी देखील त्यात फायदा घेतलेला आहे. साधारण दहा ते पंधरा लाखांपर्यंत हा आकडा जावू शकतो. त्यातील अनेक बहिणींनी स्वत:हून ते सोडणं सुरू केलं आहे. आम्ही जे अपात्र आहेत, त्यांना आम्ही आता यापुढे देणार नाही. कारण आम्ही CAGला उत्तरदायी आहोत.'' असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तर, ''एखादी योजना तुम्ही तयार केली आणि त्या योजनेच्या निकषाच्या बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही पैसे देतात तर CAG तुम्हाला हिशोब विचारतं आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागतं, की हे का दिले म्हणून. तर असा प्रकार होवू नये म्हणून जे अपात्र आहेत, त्यांना आम्ही त्यातून कमी करू. पण त्यांनी आतापर्यंत जो काही घेतलेला पैसा आहे तो काही आम्ही परत मागणार नाही. तो पैसा त्यांच्याकडेच राहील, मात्र ज्या पात्र आहेत त्यांनाच पैसा गेला पाहिजे यावर मात्र सगळ्या योजनाबाबत आमचा आग्रह असेल.'' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व योजनांबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.