
Mumbai News: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, पण महाविकास आघाडीतील जागा वाटपावरुन अद्याप आरोप-प्रत्यारोप सुरुच आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानाबाबत महाविकास आघाडीला सुंरुग लागण्याचे चित्र निर्माण झाले आहे. वडेट्टीवार यांनी घटक पक्षातील कुणाचेही नाव न घेता धमाका केला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी जागावाटपात झालेल्या विलंब आणि काँग्रेसच्या भूमिकेवर टीका केली आहे. त्यांनी काही नेत्यांना मुख्यमंत्रीपदाच्या आकांक्षेचा आरोप केला आहे. यामुळे मविआतील सध्या तरी काही आलबेल नसल्याचे चित्र आहे.
जागा वाटपाबाबत विलंब का झाला? असा प्रश्न त्यांनी आघाडीतील नेत्यांना विचारला आहे. जागा वाटपाचा तिढा लवकर सुटणं अपेक्षीत होते, पण जागा वाटपाला विलंब करण्याची गरज नव्हती. तो विलंब कुणामुळे झाला, असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. त्यावर "हा विलंब कशामुळे झाला, हे बहुतेक विजय वडेट्टीवार यांना माहीत असेल," असा पलटवार ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, "वडेट्टीवारांची जी वेदना आहे, ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे. ज्या चुका झाल्या. त्या स्वीकारल्या पाहिजेत. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागा वाटप झाल्याचे आम्हाला कळतंय. तेव्हा आम्ही सांगत होतो. पण त्यावर आता चर्चा करण्यात अर्थ नाही,"
जागा वाटपात जो विलंब लागला, त्यामागे काही कारस्थान आहे का? असा संशय वडेट्टीवारांनी व्यक्त केला होता. त्यावर "काँग्रेसला जास्त हवा होत्या. पण काँग्रेसच्या सर्वात कमी जागा निवडून आल्या. आम्ही जास्त जागा जिंकलो. पण आता त्यात कशासाठी वाद करायचा. जागा वाटपाला विलंब झाला हाच मुद्दा आहे. जागा वाटपाला विलंब झाला, त्यात मिस्टर वडेट्टीवार होतेच की. विदर्भातील काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला तर बरं झालं असतं” असा टोला राऊतांनी लगावला.
काँग्रेसच्या केंद्रीय समितीने म्हणावा तसा हस्तक्षेप केला नाही, तो करायला पाहिजे होता. महाराष्ट्रासारखं राज्य महाविकास आघाडीच्या हातून जाणं हे या राज्यासाठी दुर्घटना आहे.तीन पक्षात अजिबात समन्वय राहिला नाही. हे सत्य आहे, तो जर नाही राहिला तर भविष्यात त्याची किंमत मोजावी लागेल,असा इशाराही राऊतांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पक्षाच्या बैठकीत काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य केल्याचे म्हटलं जात आहे. यावरुनच विजय वडेट्टीवार हे संतापले आहेत. अमोल कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जर थोडा कमी द्यावा, असे सांगत वडेट्टीवारांनी कोल्हेंना फटकारलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.