मुंबई : राज्यातील विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून महाविकास आघाडी सरकारला कोडीत पकडण्यासाठी विरोधकांनी रणनीती आखली आहे. याबाबत काल (गुरुवारी) विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना या रणनीती विषयी सांगितले.
आजचा दुसऱ्या दिवस ओबीसी आरक्षण आणि राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याची मागणी या दोन मुद्यांवरून गाजण्याची शक्यता आहे.
या दोन्ही मुद्यावरुन भाजप आघाडी सरकार घेरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी काल भाजपच्या सर्व आमदारांसाठी स्नेह भोजन ठेवण्यात आले होते यावेळी आज ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती ठरली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सरकारला गुरुवारी सुप्रीम कोर्टाने धक्का दिल्याने भाजपकडून ठाकरे सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्न होऊ शकतो. (Maharashtra budget 2022 News)
ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नसल्याचा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला.
जमीन खरेदी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मंत्री नवाब मलिक यांचा अद्यापही राजीनामा घेण्यात न आल्याने विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला. याचविषयी पत्रकार परिषदेत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांन स्पष्ट केलं की, अटकेचं कारण योग्य नसल्याने नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाम आहेत.
मंबई अधिवेशन आणि बैठकांना उपस्थित न राहणाऱ्यावरून विरोधकांच्या टीकेचे धनी ठरलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिवेशनासाठी गुरुवारी सकाळीच विधानभवनात 'एन्ट्री' झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह मंत्री, आमदारांनी ठाकरे यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री ठाकरे येण्याआधी काही मिनिटे विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यामुळे मुख्यमंत्री आणि विरोधक समोरासमोर येणार का, याकडे लक्ष लागले असतानाच विरोधकांनी थोडक्यात आंदोलन आटोपले.
तब्येच्या कारणास्तव मुख्यमंत्री ठाकरे हे मागील अधिवेशनाला उपस्थित राहिले नव्हते. त्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर रोजच शरसंधान करण्याची संधी साधली होती. तरीही मुख्यमंत्री येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सांगत होते. मात्र, हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आले नाहीत. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी सहयाद्री अतिथिगृहातील चहापान आणि पत्रकार परिषदेलाही मुख्यमंत्री ठाकरे नव्हते. तेव्हाही मुख्यमंत्री ठाकरे हे शंभर टक्के अधिवेशनाला येणार असल्याचा शब्द पवार यांनी दिला होता.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे, गुरुवारी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी मुख्यमंत्री ठाकरे विधानभवनात आले. तेव्हा, माध्यमांनी त्यांना गराडा घातला. त्यातून वाटत काढत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ते विधानभवनात गेले.
विधिमंडळाच्या अधिवेशनानिमित्त सरकारविरोधात हत्यार उपसलेल्या विरोधक आक्रमक आहेत. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावर ठाम असलेले विरोधक, मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचे सांगणाऱ्या ठाकरे सरकार यांच्यात अधिवेशनात जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.