Maharashtra political crisis
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 39 आमदार एकत्र आले. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं होतं. अखेर नऊ दिवसांनंतर या सत्तानाट्याचा पहिला अंक संपला. पण या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. (Raj Thackeray Latest Marathi News)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसेच्या अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. मनसेचे नगरसेवक फोडल्याची आठवण त्यांना करून देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच भोंग्याच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. दोन्ही ठाकरे बंधू यावरून आमनेसामने आले होते.
मुंबई, ठाण्यासह औरंगाबादमध्ये सभा घेत दोघांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर अयोध्या दौऱ्यावरून मनसे विरूध्द शिवसेना असा सामना रंगला होता. आरोग्याच्या कारणास्तर राज ठाकरेंचा दौरा रद्द झाला. त्यानंतर कोरोनाची लागण आणि नंतर ऑपरेशनमुळे ते काही दिवस पक्षाचे कार्यक्रम आणि सोशल मीडियापासूनही दूर होते.
अखेर मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरेंनी ट्विरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री किंवा शिवसेनेचा उल्लेख केला नसला तरी त्यांचा रोख तोच असल्याचे स्पष्टपणे दिसते. 'एखादा माणूस ज्यादिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो,' असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा ऱ्हास होत असल्याची सूचक प्रतिक्रिया राज यांनी दिल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याला जवळपास बारा तास उलटून गेल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचीही पहिली प्रतिक्रिया आली आहे. 'वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस,' असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील 39 आमदारांनी बंड केले आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी सकाळी बहुमत चाचणीचा आदेश दिला. त्यासाठी गुरूवारी सकाळी अकरा वाजता विशेष अधिवेशनही बोलावण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयातही दिलासा न मिळाल्याने मुख्यमंत्री ठाकरेंनी रात्री राजीनामा दिला.(Eknath Shinde Latest Marathi News)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.