
Mumbai Shiv Sena politics : भाजप महायुती सरकारने राज्यात त्रिभाषा सूत्राखाली हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश काढला. ठाकरे बंधूंनी या अध्यादेशाविरोधात डरकाळी फोडताच, तो मागे देखील घेण्यात आला. आवाज मराठी विजय मेळाव्यानिमित्ताने ठाकरे बंधू मराठी अन् महाराष्ट्रासाठी तब्बल 18 ते 20 वर्षांनंतर मुंबईत एकवटलेले दिसले.
उद्धव आणि राज हे एकत्र नसल्याची अन् दोन सेना निर्माण झाल्याची खंत शिवसेनाप्रमुख तथा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना होती. तशी त्यांनी आॅक्टोबर 2012 मध्ये झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलून दाखवली होती. ठाकरे बंधू यांच्या एकत्र आल्याने या राजकीय इतिहासाला आता उजाळा मिळला आहे.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शिवसेना पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी महाबळेश्र्वर इथल्या बैठकीत नाव जाहीर केलं. यानंतर शिवसेनेत बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्या. अनेक दिग्गज शिवसेनेतून बाहेर पडले. यात राज ठाकरे यांचा देखील समावेश होता. मुंबई महापालिकेच्या निवडणुका झालेल्या होत्या. यानंतरच्या राजकीय घडामोडी सुरू असतानाच, शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना जुलै 2012मध्ये हृदयविकाराचा त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राज ठाकरे (Raj Thackeray) तेव्हा अलिबाग इथं पक्षाच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. परंतु उद्धव ठाकरे रुग्णालयात असल्याचे समजताच, ते तडक मुंबईला परतले. उद्धव ठाकरेंवर उपचार होईपर्यंत ते रुग्णालयातच थांबलेले होते. उद्धव राज यांच्या मोटारीतूनच 'मातोश्री'वर परतले. यानंतर राज ठाकरे 'मातोश्री'वर तासभर थांबले होते. याच काळात त्यांनी बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली. यानंतर राज अन् उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या.
उद्धव यांच्या आजारपणातच बाळासाहेबांची प्रकृती खालावली. त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी देखील राज ठाकरे रुग्णालयात पोचले होते. राज यांनी बाळासाहेबांची तिथं त्यांची भेट घेतली. लीलावती रुग्णालयातून परतल्यानंतर बाळासाहेबांना राज अन् उद्धवमध्ये बराच साम्यपणा आहे, असे एका मुलाखतीत म्हटले.
याच दरम्यान, रझा अकादमीने 11 ऑगस्ट 2012मध्ये मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ धुमाकूळ घातल्याच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी गिरगावहून आझाद मैदानावर मोर्चा काढला. बाळासाहेबांना या मोर्चाची प्रशंसा केली. याचवेळी उद्धव अन् राज यांना एकत्र येण्यामध्ये माध्यमांनी खोडा घालू नये, असेही बजावले होते.
ऑक्टोबर 2012च्या शिवसेना दसरा मेळाव्यात बाळासाहेब उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्यांच्या मुलाखतीची चित्रफित दाखवण्यात आली. उद्धव अन् आदित्यला सांभाळा, असे आवाहन शिवसेनाप्रमुख म्हणून केले. त्याचबरोबर शिवसेनेची जिथे स्थापन झाली, त्याच दादरमध्ये आता दोन सेना असल्याबद्दल त्यांनी जाहीर खंत व्यक्त केली. ही वेळ आत्मपरीक्षणाची आहे. मराठी माणसांसाठी एकत्र या, असे आवाहन बाळासाहेब ठाकरेंनी केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.