
Pahalgam terror attack victim : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडला आहेच, शिवाय प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रचंड संतापही आहे. मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांमध्ये देभरातील विविध राज्यांमधील नागरिकांचा समावेश आहे. ज्यात महाराष्ट्रातील सहा जण असून मुंबईच्या डोंबिवलीमधील अतुल मोने यांचाही मृतांमध्ये समावेश आहे.
दहशतवाद्यांनी जेव्हा अतुल मोनेंवर गोळी चालवली त्याआधी नेमंक काय घडलं, हा संपूर्ण घटनाक्रम त्यांची कन्या ऋचा मोने हिने सांगितला आहे. तिच्या डोळ्यादेखत तिच्या वडिलांवर गोळी चालवली गेली परंतु ती काहीही करू शकले नाही, असा काळीज पिळवटून टाकणारा घटनाक्रमक तिने सांगितला आहे.
ऋचा मोने हिने सांगितले की, ''आम्ही फिरायला गेलो होतो, पेहलगाम बैसरन टेकड्यांवर (मिनी स्वित्झर्लंड) येथे आम्ही होतो. सगळं व्यवस्थित सुरू असतानाच अचानक फायरिंग सुरू झाले. हिंदू कोण, मुस्लिम कोण असे विचारत त्यांनी संजय काकांना गोळी मारली. हेमंत काका विचारायला गेले की काय झालं, आम्ही काही करणार नाही असे ते बोलतच त्यांना गोळी मारली. माझे बाबा तेथे गेले ते म्हणाले गोळी नका मारू, आम्ही काही करणार नाही असे ते बोलताच त्यांनी माझ्या समोरच बाबांना पोटात गोळी मारली आणि मी काहीच करू शकले नाही. काका, बाबांसोबत घडलेला तो हृदयद्रावक प्रसंग सांगतानाच ऋचा मोने हिच्या भावनांचा बांध फुटला. अनुष्का यांचेही अश्रू थांबत नव्हते. आईला धीर देत ऋचा हे सगळं सांगत होती.''
पहलगाम येथे घडलेली घटना आणि आलेला हृद्रयद्रावक अनुभव बारावीचे शिक्षण घेतलेली अतुल मोने यांची कन्या ऋचा हिने माध्यमांना सांगितला. यावेळी सोबत आई अनुष्का व ऋचाचे मामा प्रसाद सोमण होते. डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडीतील श्रीराम अचल सोसायटीत मोने कुटुंब राहते.
अनुष्का म्हणाल्या, पहलगाम येथे सौंदयसृष्टीचा आनंद घेत होतो. पर्यटकांची खूप गर्दी होती. काही भागात काही खेळ सुरू आहेत म्हणून तेथे गर्दी जमली आहे असे वाटले. काही पर्यटक घाईघाईने बेसरन टेकड्या उतरून पहलगामच्या दिशेने निघाले होते. आम्ही निघणार तोच काही लोक लष्करी वेषात आले व त्यांनी फायरिंग सुरू केली. त्यांनी घोळक्याने सर्व पर्यटकांना एकत्र येण्यास सांगितले. हल्ल्याचा अनुभव असलेल्या स्थानिक घोडेस्वारांना कल्पना आल्याने त्यांनी सगळ्यांना खाली झुका असे सांगत आपला जीव वाचवा असे म्हणाले.
त्यानंतर तेथे आलेल्या दहशतवाद्यांनी हिंदू कोण मुस्लिम कोण असे विचारले. हिंदू कोण विचारताच जीजू संजय यांनी हात वर केला त्याच क्षणी त्यांना गोळी मारली गेली. ते पाहून हेमंत जीजू विचारायला गेले काय झाले, आम्ही काही करणार नाही असे ते म्हणताच त्यांना गोळी मारली. हे पाहून अतुल यांनीही गोळी मारू नका असे म्हटले आणि त्यांच्याही पोटात गोळी मारण्यात आली. हा काळीज पिळवटणारा हृदयद्रावक प्रसंग सांगताना अनुष्का, ऋचा मोने यांना शोक अनावर झाला होता.
दहशतवाद्यांनी महिला, मुले यांना हात लावला नाही. त्यांनी घरातील कर्त्या पुरुषांना लक्ष्य केले. मोदींचा उल्लेख करत काश्मीरमध्ये आपण आंतक माजविला आहे, असे दहशतवादी पर्यटकांना सुनावत होते. त्यानंतर ते निघून गेले. तेथील लोकांनी आम्हाला तुमचा जीव वाचवून तुम्ही पळा, गोळी लागलेल्या लोकांना आर्मी येऊन त्यांच्यावर उपचार होतील असे सांगितले. म्हणून आम्ही तेथून निघालो असे अनुष्का यांनी सांगितले, यानंतर त्यांना पुढे काही बोलवतच नव्हते.
अनुष्का यांचे भाऊ प्रसाद सोमण म्हणाले, ''सामान्य पर्यटकांनी कसली दहशत माजवली आहे? कोणाचा राग निष्पाप पर्यटकांवर कशासाठी? पर्यटनासाठी धर्म लागतो का?, असे प्रश्न केले. हे क्रूर कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना सरकारने पकडलं पाहिजे. पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला पाहिजे. पर्यटकांच्या घरातील कर्ते पुरूष दहशतवाद्यांनी मारले. प्रत्येक घरात मुले शिक्षण घेत आहेत. काही घरात कमविता कोणी नाही. या गोष्टींचा विचार करून सरकारने मृत पर्यटकांच्या घरात शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या शिक्षणाचा भार उचलावा. त्यांना नोकरीत प्राधान्य मिळेल यासाठी प्रयत्न करावेत.''
ऋचा म्हणाली, आम्हाला वाटलं होतं काश्मीर सेफ आहे. याआधी मी लहान असताना आई-बाबा सोबत मी काश्मीरला गेले होते. ही माझी दुसरी वेळ होती. असे काही घडेल तेव्हा वाटलं नव्हतं. पहिलाच दिवस होता आमचा. मिनी स्वित्झरलँड येथे असताना काही लोक तेथे आले त्यांनी फायरिंग सुरू केली. माझे काका, बाबा यांना गोळी मारली माझ्यासमोर आणि मी काही करू शकले नाही. काही वेळ आम्ही तसेच तेथे बसून होतो. नंतर ते लोक गेल्यावर आम्ही सगळ्यांनी बाबाला उठवायचा प्रयत्न केला पण बाबा उठत नव्हता. त्यांना हालचाल करता येत नव्हती. काही लोकांनी आम्हाला सांगितले तुमचा जीव वाचवा, जखमींना आर्मीचे लोक घेऊन येतील म्हणून आम्ही निघालो. सरकार आम्हाला न्याय देईल एवढीच आमची अपेक्षा आहे. असे ऋचा म्हणाली.
(Edited by -Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.