

Mumbai Bihar Bhavan controversy : मुंबई महापालिका निवडणुकीत 'मराठी अस्मिते'चा मुद्दा तापलेला असतानाच, ठाकरे बंधूंनी एकत्र येत निवडणुकीत मिळवलेलं यश अन् त्यानंतर भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना युती महापौरपदावर खलबंत करत असतानाच, बिहारमधील भाजप-जेडीयू सरकारने मुंबईत 'बिहार भवन' उभारण्याची तयारी सुरू केल्याची बातमी धडकताच, मनसेने संघर्षांची तयारी असल्याचा इशारा दिला आहे.
या बिहार भवनमुळे मनसेचे नेते, यशवंत किल्लेदार यांनी, 'मुंबईत हे लाड खपवून घेणार नाही', असा खणखणीत इशारा दिल्यानं, मुंबईतील राजकीय वातावरण आगामी काळात चांगलेच तापणार असल्याची चिन्हं आहेत.
बिहारमधील भाजप (BJP)-जेडीयू सरकारने मुंबईत भव्य बिहार भवन उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी 314 कोटी रुपयांची तरतूद केली असून, ही इमारत 30 मजली असणार आहे. या बिहार भवनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी अशा प्रकारचे कोणतेही लाड मुंबईत खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठीविरुद्ध अमराठी, असा संघर्षाची चिन्हे आहेत.
मनसेचे (MNS) नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी, मुंबईत बिहार भवनाची गरजच काय? असा सवाल उपस्थित करीत, यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप केला. किल्लेदार म्हणाले, "उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. अशा प्रकारे कोणाचेही लाड मुंबईत खपवून घेतले जाणार नाहीत." मनसेने या प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
बिहार सरकार या प्रकल्पाकडे मानवतावादी आणि विकासात्मक दृष्टिकोनातून पाहात असले, तरी मुंबईतील राजकीय परिस्थितीत याला राजकीय रंग चढला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत, शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेने मुंबईतील मराठी अस्मिताचा मुद्याला हात घातला. ठाकरे बंधूंच्या प्रचारात हाच मुद्दा महत्त्वाचा होता. असे असताना, निवडणुकीच्या तोंडावर बिहार भवनाचा प्रस्ताव म्हणजे, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून आगामी काळात संघर्षाची मोठी चिन्हं आहेत.
दिल्लीतील बिहार भवनच्या धर्तीवर मुंबईत हे भवन उभारण्याचा निर्णय बिहार मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी 314.20 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. बिहारमधून टाटा मेमोरियलसारख्या रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण आणि सरकारी कामासाठी येणाऱ्या नागरिकांची राहण्याची सोय करणे हा यामागील उद्देश आहे. 30 मजली इमारतीत 178 खोल्या, 240 बेडची डॉर्मिटरी (सामूहिक निवासस्थान) आणि अद्ययावत पार्किंग व्यवस्था असेल.
मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना भाजप-जेडीयू सरकारने निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय मतदारांना चुचकारण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे. मुंबईत आधीच जागेची टंचाई असताना दुसऱ्या राज्यासाठी इतक्या मोठ्या इमारतीला जागा देणे आणि त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणे, यावरून मराठी संघटनांनी नाराजी दर्शवली आहे. अशा प्रकारचे भवन उभारल्यास इतर राज्येही अशाच मागण्या करतील, ज्यामुळे मुंबईतील नागरी सुविधांवर ताण येईल, असा मतप्रवाह निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.