

डोंबिवली: अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार याद्यांतील गोंधळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावरून आता राजकारण तापले आहे. ठाकरे बंधूंनी दुबार व तिबार मतदार मुद्दांवर थेट निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे.
आता सत्ताधारी भाजपनेही या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवला आहे. ठाकरेंनी निवडणूक याद्यांवर आक्षेप घेतल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीच स्वतः पुढाकार घेत मतदार यादीतील गैरव्यवहारांवर संताप व्यक्त केल्याने हा विषय अधिकच गंभीर बनला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरत थेट जाब विचारत निवडणूक रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
चव्हाण यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर सरळसरळ आरोप करत सांगितले की मतदार याद्या अत्यंत बेफिकिरीने आणि जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने तयार केल्या जात आहेत. “उल्हासनगरमधील मतदारांची नावे अंबरनाथच्या याद्यांमध्ये टाकली जात आहेत. विशिष्ट लोक सांगतील त्या ठिकाणी नावे वाढवली जात आहेत. निवडणुकीच्या याद्या अधिकारी यांच्या बाजूलाच बसून तयार केल्या जातात, असा आमचा स्पष्ट आरोप आहे,” असे ते म्हणाले. या परिस्थितीमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर संशयाचे सावट पसरत आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.
मतदार याद्यांतील प्रचंड गोंधळाचा दाखला देत चव्हाण यांनी थेट संपूर्ण निवडणूकच रद्द करण्याची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे. दोषी अधिकाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा कठोर इशाराही त्यांनी दिला. निवडणुकीच्या अगदी तोंडावर चव्हाण यांची अशी तीव्र प्रतिक्रिया आल्याने प्रशासनासमोर नवीन संकट उभे राहिले आहे.
दुबार-तिबार नावे,चुकीच्या प्रभागात केलेला नावांचा समावेश, हेतुपुरस्सर फेरफार केल्याचे आरोप आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या निष्पक्षतेवर उठलेले प्रश्न… या सगळ्यांमुळे मतदार यादीचा गोंधळ दिवसेंदिवस वाढतच आहे. एकीकडे विरोधक तर दुसरीकडे सत्ताधारी दोन्ही बाजूंनी एकाच मुद्द्यावर नाराजी व्यक्त केल्याने अंबरनाथमध्ये निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे.
या संपूर्ण गोंधळामुळे मतदार यादी सुधारली जाईल का,निवडणूक आयोग कोणती कारवाई करेल आणि निवडणूक रद्द करण्याच्या मागणीवर पुढे काय भूमिका घेतली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.