

BMC Election Update : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे नेते संतोष धुरी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राज ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेंनाही हा झटका मानला जात आहे. धुरी हे आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील मनसेचे पदाधिकारी होते. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करताच धुरी यांनी थेट राज ठाकरेंवर निशाणा साधला.
मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेची पहिल्यांदाच युती झाली आहे. यापार्श्वभूमीवर झालेल्या वाटाघाटींवरूनच पक्ष सोडल्याचे धुरी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, पक्षस्थापनेपासून आम्ही राज साहेंबाबरोबर होतो. शाखाध्यक्ष, नगरसेवक अशी विविध पदे भुषविली. हिरव्या लोकांच्या जवळ गेलेल्यांनाच राज साहेबांनी जवळ गेले. त्या लोकांनी (उद्धव ठाकरे) पूर्णपणे पक्षाचा ताबा घेतला आहे. आमचा पक्ष साहेबांनी सरेंडर केलाय, असा गंभीर आरोप धुरी यांनी केला.
आम्हाला मिळालेल्या जागा ५२ असल्या तरी त्यातला ७ ते ८ जागा निवडून येतील की नाही याची शंका आहे. त्यांच्याकडे उमेदवार नसलेल्या जागा दिल्या. माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या ठिकाणी ताकद जास्त असून एक-एक जागा दिली. आम्हाला या चर्चेत सहभागी करून घेतले नाही, सीट दिली नाही, याचा राग नाही. परंतू आमचे नेते संदीप देशपांडे यांना कुठल्याही प्रकारच्या चर्चेत सहभागी करून घेतले नाही. विचारणा केल्यानंतर कळाले की वरून असा तह झाला आहे की, त्या तहात साहेबांनी दोन किल्ले सरेंडर केले आहेत, एक संतोष धुरी आणि एक संदीप देशपांडे, असे धुरी यांनी सांगितले.
वांद्राच्या बंगल्यावरून सांगण्यात आले की, हे दोघे कुठेही दिसता कामा नयेत. चर्चा किंवा उमेदवार म्हणून दिसू नयेत, असा तह झाला. हे कळाल्यानंतर हे देशपांडे यांना सांगितले. असं होत असेल तर इथे राहण्यात काय अर्थ? काँग्रेससोबत जाऊन या लोकांनी आधीच आपले रक्त हिरवे केले आहे. आता इकडे येऊन आमचंही रक्त हिरवं करण्याचा प्रयत्न करणार. आपल्याला कुठेही स्थान देणार नाहीत. त्यापेक्षा मी वेगळा विचार करतो, असे सांगून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे धुरी म्हणाले.
संदीप देशपांडेचे मन खूप मोठे आहे. तो त्याचा निर्णय घेईल. पण माझे मन मोठे नाही, म्हणून मी हा निर्णय घेतला. मराठी माणसांसाठी तुम्ही भांडणार असाल तर सभागृहात तसे चेहरेही गेले पाहिजे. ज्या सीट निवडून येणार नाही, अशा तुम्ही देणार असाल तर कसं होणार? अनुभवी लोकांना चर्चेत सहभागी करून घेणार नसाल, त्यांना पुढे पाठविणार नसाल तर कसं होणार?, असे सवाल धुरी यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.