कऱ्हाड : जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय पुणे- बंगळूर महामार्गावर वाहन अपघातातील नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी व जखमींना वेळेत उपचार मिळण्यासाठी खंडाळा आणि काशीळ येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करावेत, अशी मागणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
खासदार पाटील यांनी याबाबत मंत्री टोपे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले की, सातारा लोकसभा मतदारसंघातून पुणे- बंगळूर महामार्ग जातो. जिल्ह्यातील महामार्गाची हद्द नीरा नदीच्या पात्रापासूनच्या शिरवळ येथून सुरू होते. ती कऱ्हाड तालुक्याच्या मालखेड येथे संपते. महामार्गावर दररोज शेकडो वाहनांची ये- जा होत असते. ती संख्या वाढते आहे.
मात्र, महामार्गावर किरकोळ, गंभीर अपघात होत आहेत. त्या अपघातानंतर उपचाराअभावी अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांचा रस्त्यावरच मृत्यू होतो आहे. महामार्गावर अद्ययावत असे ट्रामा केअर सेंटर नसल्यामुळे जखमींना योग्य वेळेत उपचार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागतो आहे. ही स्थिती लक्षात घेऊन खंडाळा व काशीळ येथे ट्रामा केअर सेंटर व्हावे, असे वाटते.
त्यात खंडाळ्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आरोग्य विभागाकडे प्रलंबित आहे. काशीळ येथे नव्याने झालेल्या ग्रामीण रुग्णालयातही ट्रामा केअर सेंटर सुरू झाल्यास अनेकांचे प्राण वाचतील. त्यामुळे खंडाळा व काशीळ या दोन्ही ठिकाणी ट्रामा सेंटर सुरू करण्याबाबतचा निर्णय त्वरेने होऊन त्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.