
काँग्रेसचे खासदार, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीवरुन रान उठवलं आहे. पत्रकार परिषदा घेऊन मतदार याद्या, लोकसभेसाठी झालेले मतदार, यातील गैरप्रकार हे उघडकीस आणत केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला आहे. अशातच आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदाराला कोर्टानं मोठा दणका दिला आहे. सुप्रिम कोर्टानं त्यांची याचिका फेटाळली आहे.
मुंबई शिक्षक मतदार संघातील ठाकरे सेनेचे आमदार जे. एम. अभ्यंकर यांची विशेष विनंती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून ठाकरेंना मोठा झटका दिला आहे. मुंबई हायकोर्टाने सुरू केलेली सुनावणी थांबवण्यासाठी ज मो अभ्यंकर यांनी सुप्रीम कोर्टात विशेष विनंती याचिका दाखल केली होती.
जून 2024 रोजी मुंबई शिक्षक मतदार संघात झालेल्या निवडणुकीत ठाकरे सेनेचे उमेदवार जे. एम. अभ्यंकर विजयी झाले होते. दुसऱ्या क्रमांकावरील शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष मोरे यांनी या निकालाला हायकोर्टात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान दिले होते. मुंबई हायकोर्टाने सुभाष मोरे यांची याचिका दाखल करून आरोपांची शहानिशा करण्यासाठी सुनावणी सुरू केली. ही सुनावणी थांबवण्यासाठी अभ्यंकर यांनी सुप्रीम कोर्टात विशेष विनंती याचिका दाखल केली. ही याचिका फेटाळण्यात आली आहे.
7 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च कोर्टात झालेल्या युक्तिवादात अभ्यंकर यांच्या वतीने वकील विपीन संघी यांनी हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी नरसिंहा आणि न्यायाधीश ए चांदूरकर यांनी अभ्यंकर यांची विशेष विनंती याचिका रद्द करून मुंबई हायकोर्टात सुभाष मोरे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सुभाष मोरे यांच्या वतीने अमोल चितळे यांनी बाजू मांडली.
मुंबई शिक्षक मतदार संघाचा निकाल 1 जुलै 2024 रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत पहिल्या फेरीच्या मतमोजणी दरम्यान घोषित उमेदवार अभ्यंकर यांना 3079 मते तर सुभाष मोरे यांना 3011 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमध्ये केवळ 68 मतांचा फरक होता. हा फरक शेवटून दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या फेरीत 208 मतापर्यंत गेला.
अभ्यंकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मुख्याध्यापकामार्फत 587 अपात्र मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप सुभाष मोरे यांनी दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. या अपात्र मतदारांमध्ये प्लेग्रुप, माॅन्टेंसरी, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि काही शिक्षकेतर कर्मचारी यांची नोंदणी करण्यात आली आहे.
काही मतदार असे आहेत की ज्यांचे वय 18 ते 25 वर्ष असून त्यांना किमान तीन वर्षाचा शिकवण्याचा अनुभव नाही. अभ्यंकर सल्लागार असलेल्या अथवा विश्वस्त मंडळात असलेल्या शाळांमधून अपात्र मतदारांची नोंदणी झालेली असल्यामुळे अभ्यंकर यांची निवड रद्द करून दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार सुभाष मोरे यांना विजयी घोषित करावे अशी मागणी याचिकेत केलेली आहे. हायकोर्टाने मोरे यांची याचिका दाखल करून त्यांनी याचिकेद्वारे केलेल्या आरोपांची शहानिशा करण्याचे मान्य केले आहे.
माजी आमदार कपिल पाटील यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत केले आहे. "उबाठा गटाचे आमदार अभ्यंकर यांनी वोटचोरी करून मुंबईतील शिक्षकांची फसवणूक केली आहे. 587 अपात्र मतदार वगळल्यास मुंबई शिक्षक मतदार संघातून सुभाष मोरे यांचा विजय स्पष्ट आहे. मुंबईतील शिक्षकांनी नेहमीच शिक्षक भारती संघटनेवर विश्वास दाखविला आहे. मुंबईतील शिक्षकांना हायकोर्टात न्याय मिळेल याची खात्री आजच मिळाली,असे कपिल पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.