छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राला नख लावण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आपल्याला सावध राहिले पाहिजे. इंग्रजांविरोधात बंड पुकारताना महात्मा गांधींनी 'चले जाव'चा नारा दिला होता. आता महायुती सरकारविरोधात 'चले जाव' चा नारा द्यावा लागणार आहे. असे आवाहन करत मोदी सरकारला गांधी नावाची भीती सतावते, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
मुंबईत 'भारत छोडो' आंदोलनाला 82 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तेजपाल हॉल येथे आयोजित कार्यक्रमात वडेट्टीवार बोलत होते. वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) म्हणाले, "पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण केले जात आहेत. त्यामुळे आपल्याला सावध राहिले पाहिजे. धार्मिक तेढ निर्माण करून महायुती सरकारला मते मिळत नाही, म्हणून हे उद्योग सुरु केले आहेत. त्यामुळे पुढचे दोन-अडीच महिने दक्ष राहून या प्रवृत्तीविरोधात लढावे लागेल."
"महात्मा गांधी यांनी 'करो या मरो' असा नारा दिला. इंग्रजांचे सोबती आता सत्तेत आहेत आणि तेच आता देशभक्ती सांगत आहेत. महायुतीने महाराष्ट्राची अस्मिता दिल्लीत गहाण ठेवली आहे. त्यामुळे महायुतीचा हिशेब चुकता करावा लागेल. राज्यात सत्ता परिवर्तन अटळ आहे," असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
"लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांनी राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांची सत्ताधीशांना भीती वाटते. राहुल गांधी देशाच्या, संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाही वाचविण्यासाठी लढत आहेत. ही लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे. आता महाराष्ट्राच्या लढाईसाठी आपल्याला तयार व्हावे लागेल. पुढची लढाई 'करो किंवा मरो' ची आहे. महाराष्ट्र वाचविण्याची आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. मोदी सरकारला गांधी नावाची भीती सतावते," असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.