
Beed News : बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या 'कनेक्शन'वरुन भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके आक्रमक पवित्रा घेतला होता. गंभीर आरोपांची एकापाठोपाठ एक तोफ डागत भाजप आणि राष्ट्रवादीच्या या दोन्ही आमदारांनी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर मोठा दबाव निर्माण केला. आता याच नेत्यांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी 'जोर का झटका' दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीसाठी गुरुवारी (ता.30) दाखल झाले होते.यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडेंसमोरच (Dhananjay Munde) बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरुन रोखठोक इशारा दिला.त्यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन समितीतून सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांना हटवून अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या विरोधातली धार कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रवेशासाठी अजित पवारांनी त्यावेळी जोर लावल्याचे बोलले जात होते.त्यानंतर मुंडेंना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली.त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही दिलं गेलं.या काळात त्यांनी सभागृह गाजवलं.
त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना सामाजिक न्यायमंत्री वर्णी लागली. अजित पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या मुंडेंचं राष्ट्रवादी पक्ष आणि सरकारमधलं कायम वजन वाढतच राहिलं. त्यानंतर राष्ट्रवादीतील बंडात धनंजय मुंडेंची सामाजिक न्यायमंत्रीपदी वर्णी लागली.
अजित पवारांनी 40 आमदारांसह केलेल्या बंड आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याच्या निर्णयात धनंजय मुंडेंची भूमिका महत्त्वाची आणि मोठी असल्याची बोलले जात आहे. याचंच बक्षीस म्हणून धनंजय मुंडेंना त्यानंतर अजित पवारांनी थेट कृषिमंत्री सारखं वजनदार खातंही दिलं.हे त्यांचं राष्ट्रवादीतल्या वाढत्या वजनाचं द्योतक होतं.
धनंजय मुंडे हे परळी मतदारसंघातून यावेळी विक्रमी मताधिक्क्यानं निवडून आले होते.त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ की धनंजय मुंडे असा पेच निर्माण झाला,त्यावेळीही अजितदादांनी पुन्हा एकदा आपला कौल मुंडेंच्या बाजूने दिला. आणि अखेरच्या टप्प्यांत भुजबळांचा कडवा विरोध पत्करुन त्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान दिलं. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खातं दिलं. यावरुन मुंडेंचं पक्षातील स्थान अधोरेखित होतं.
पण हेच धनंजय मुंडे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत.संतोष देशमुख हत्येप्रकरणामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे,भाजप आमदार सुरेश धस,माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके,मनोज जरांगे यांच्यासह विरोधकांनी त्यांना घेरलं आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या कनेक्शनचा संदर्भ देत कोट्यवधींचा भ्रष्टाचारावरुन गंभीर आरोप केले जात आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी बीड जिल्हा गेल्या काही दिवासांपासून चर्चेत आहे. तसेच वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा,अशी मागणी केली आहे. पण बीडमध्ये येऊन मुंडेंच्या राजीनाम्यावर चकार शब्द न काढता सुरेश धस आणि प्रकाश सोळंके यांच्यासारख्या विरोधकांवर कारवाई केली. यावरुन अजितदादांनी एकप्रकारे धनंजय मुंडेंनाच अभय दिल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.