भुजबळांना तुरुंगात टाकणाऱ्या सरकारचेच मंत्री जेंव्हा भुजबळांचा गुणगौरव करू लागतात ... 

sharad-pawar-@samta
sharad-pawar-@samta
Published on
Updated on

पुणे : महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेच्यावतीने महात्मा फुले वाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्याच्या मंत्र्यांनीही सध्या तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत ते या संकटातून लवकरच बाहेर पडतील, अशी प्रार्थना ईश्‍वराकडे केली. 

केंद्रीय राज्य मंत्री  उपेंद्र कुशवाह यांनी ' भुजबळ लवकरच या अडचणीतून बाहेर पडतील' असे सांगितले, तर राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी  ' भुजबळांना ज्या कलमाखाली कायद्याच्या कचाट्यात ओढले आहे, ते कलमच रद्द झाले आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळू शकतो' अशी भविष्यवाणीही केली. 

छगन भुजबळ अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय समता परिषदेतर्फे दरवर्षी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी व जयंतीनिमित्त फुले वाड्यावर कार्यक्रम आयोजित केला जातो. भुजबळ स्वतः या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये लक्ष घालत असत . मात्र भुजबळ सध्या  तुरुंगात असल्याने  परिषदेचे पदाधिकारी हा कार्यक्रम घेतात.

   राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह परिषदेचे पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. 

कुशवाहा यांनी आपल्या भाषणाची सुरवातच भुजबळांपासून केली. कुशवाहा म्हणाले, "  आज छगन भुजबळ पाहिजे होते. मात्र ते सध्या संकटातून जात आहेत. लवकरच ते आपल्यासोबत सार्वजनिक कार्यक्रमात असतील."

"महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य व विचार पोचविण्याचे काम भुजबळ यांनीच केले. सामाजिक काम करणाऱ्या, दबलेल्या, पिचलेल्यांसाठी काम करणाऱ्यांना अडचणी येतात, अडचणी येतात, त्याच भुजबळांना आल्या आहेत. त्या भुजबळांना येत आहेत. लवकरच ते यातून बाहेर पडतील.'' 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादीच्या नेत्यांवर एरवी तोंडसुख घेणाऱ्या  कांबळे यांनी या कार्यक्रमात मात्र भुजबळांचे कौतुक करत त्यांच्याबद्दल सहानुभूतीही व्यक्त केली. तसेच त्यांच्या जामीनाविषयी भविष्यवाणीही केली.

कांबळे म्हणाले, " भुजबळ यांनी ओबीसी समाजाबरोबरच सामान्य नागरिक, गरीब व दुर्लक्षित घटकांसाठी काम केले आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून भुजबळ कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. त्यांना जामीन मिळत नव्हता. ते  कलम 24 रद्द झाले आहे. त्यामुळे आता भुजबळ यांचा जामीन मिळण्याचा अडसर दूर झाला आहे.'' 

शरद पवार यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले यांच्या विचारांचा मागोवा घेतला आणि महात्मा फुले यांचे कार्य समाजपरिवर्तनास कसे चालना देणारे होते याबाबत सविस्तर भाष्य केले .

 भुजबळ यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेताना पवार म्हणाले, "भुजबळ यांनी सातत्याने केलेल्या संघर्षामुळेच महात्मा फुले वाड्याचा विकास झाला. राष्ट्रीय स्मारक होऊ शकले.''

  अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत डॉ.मा.गो.माळी यांना 'महात्मा फुले समता पुरस्कार' शरद पवार यांच्या हस्ते यावेळी  प्रदान करण्यात  आला . यावेळी  व्यासपीठावर  कृष्णकांत कुदळे देखील उपस्थित होते . 

समता  परिषदेच्या व भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात भुजबळ यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत नेत्यांचे लक्ष वेधून घेतले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com