Manikrao Thackeray News : 'आज निवडणूक आयोगाचा गळा भाजपा अन् मोदींनी...' ; माणिकराव ठाकरेंचं वक्तव्य!

Congress Vs BJP : '... हे नरेंद्र मोदी‌ यांचे मत त्यांचा तोल सुटल्याचे द्योतक आहे.' असंही माणिकराव ठाकरेंनी म्हटलं आहे.
Manikrao Thackeray
Manikrao Thackeraysarkarnama

Pune Loksabha Election 2024. : 'सर्वांना न्याय‌ मिळावा, निवडणूक प्रक्रिया निपक्षपातीपणे व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, आज निवडणूक आयोगाचा गळा भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या हातात ठेवला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून निपक्षपातीपणे कामकाज होईल, याची शाश्वती नाही. संवैधानिक संस्था नैस्तनाबूत करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे.', अशी‌ टीका काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केली.

पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माणिकराव ठाकरे बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manikrao Thackeray
Sanjog Waghere Patil : शक्तिप्रदर्शन करत वाघेरेंनी भरला उमेदवारी अर्ज; आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे अन् रोहित पवारांची उपस्थिती

माणिकराव ठाकरे म्हणाले, 'लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी मतदान झाले. यामध्ये इंडिया आघाडीला यश मिळतेय, हे समोर येत आहे. केंद्र सरकारवर जनतेची नाराजी असल्यामुळे 76 लाख लोकांनी मतदान केले नाही. ग्रामीण भागात व तरुणांमध्ये मोदी सरकारबद्दल रोष आहे. भाजपाच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने ते समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम करत आहे.

पंतप्रधान देशाचे असताना ते हिंदू-मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करत आहेत. आमच्या जाहीर नाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे, अशी टीका पंतप्रधानांनी करणे दुर्दैवी आहे. आमच्या जाहीर नाम्यामध्ये मुस्लिमांबद्दल कुठेही उल्लेख नाही. त्यांच्या या विधानाने आमच्या न्याय पत्राला (जाहीरनाम्याला) प्रसिद्धी मिळाली.'

याचबरोबर 'पहिल्या‌ टप्प्यात विदर्भातील सर्व पाच जागा इंडिया आघाडी‌ जिंकणार आहे. संपूर्ण राज्यात व देशात काँग्रेस व इंडिया आघाडीला‌ चांगले दिवस आहेत. शेतकऱ्यांना लागणाऱ्या प्रत्येक बाबींची किंमतीत वाढ झालेली आहे. शेतमालास भाव नाही, त्यामुळे शेतकरी‌ त्रस्त आहे. देशातील संस्था विकण्याचा धडाका‌ सुरू आहे. देशात महिला‌ सुरक्षित नाहीत, याचे परिणाम या निवडणुकीत दिसतील. आघाडीमध्ये‌ सर्वत्र एकोप्याचे चित्र आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आघाडीचे चारही उमेदवार चांगल़्या मताने निवडून येतील.' असंही माणिकराव ठाकरेंनी सांगितलं.

काँग्रेसने न्याय पत्र म्हणून आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला -

माणिकराव ठाकरे म्हणाले, 'मोदी यांच्या‌ सत्ताकाळात 30 लाख नोकऱ्या‌ थांबल्या आहेत. इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर सहा महिन्यातच या नोकऱ्यांची भरती‌ केली जाईल. आमच्या‌ न्याय पत्रात शेतकऱ्यांची‌ कर्जमाफी करू, स्वामीनाथन समितीच्या‌ शिफारशी स्वीकारू, महिलांसाठी महालक्ष्मीयोजने अंतर्गत महिलेच्या खात्यात दर वर्षी एक लाख रूपये, आरोग्यासाठी २५ लाख रुपये, आदींचा उल्लेख आहे.'

तसेच, 'हा जाहीरनामा अतिशय‌ चांगला‌ आहे. भाजपने आश्वासने दिली पण ती पाळली नाहीत, त्यामुळे भाजपची चारशे पारची घोषणा पोकळ असून ते 200 सुद्धा पार करणार नाहीत. भाजपच्या जाहीरनाम्यावर लोकांचा विश्वास नाही. त्यांनी दिलेली गॅरंटी फसवी आहे, हे लोकांच्या लक्षात आले आहे. जाहीरनाम्यातील तरतुदी काँग्रेस पक्षाच्या‌ सरकारने कर्नाटक, तेलंगणा येथे पूर्ण केल्या आहेत.', असेही ठाकरे म्हणाले.

'काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील महिलांचे मंगळसूत्र राहणार नाही, हे नरेंद्र मोदी‌ यांचे मत त्यांचा तोल सुटल्याचे द्योतक आहे. वरिष्ठ पद भुषविणाऱ्या‌ व्यक्तीने असे बोलणे दुर्दैवी असून त्यांच्या पायाखालची वाळू घसरत आहे.', असं माणिकराव ठाकरेंनी सांगितले.

Manikrao Thackeray
Pune Lok Sabha Constituency : वंचितनंतर एमआयएमच्या एन्ट्रीने रवींद्र धंगेकर खिंडीत? पुण्यात चौरंगी लढत...

दोन पक्ष फोडल्याचे परिणाम दिसतील -

'फडणवीस व भाजपने सूड उगवून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फोडले. मोदी‌-शाहांनी मदत करून पक्ष व चिन्ह काढून घेणे, षडयंत्र रचणे हे पुण्यातील लोकांना पटलेलं नाही. षडयंत्र करणारे कोण आहेत, माहिती आहे. अजित पवार व एकनाथ शिंदे‌ केवळ मोहरे आहेत. उमेदवार बदलले, स्वाभिमान शिल्लक राहिला नाही. अजित पवारांना चार उमेदवार दिले त्यातही दोन उमेदवार भाजपने दिले.' असा टोलाही माणिकराव ठाकरेंनी लगावला.

एकनाथ शिंदे - अजित पवारांनी पायावर दगड मारून घेतला -

'अजित पवार पूर्वी राज्यातील निवडणुकीच्या‌ जागा ठरवत असत, शरद पवार कधीही त्यात हस्तक्षेप करत नव्हते. आज अजित पवारांची अवस्था काय आहे, ऐवढे मिंधे होण्याची गरज काय? भाजपाने त्यांना घरातलाच उमेदवार देण्यास भाग पाडले.'

'उद्धव ठाकरे यांनी शिंदेंना काय नाही दिले. सर्व निर्णय शिंदे घेत होते. त्यावेळी या दोघांना जी उंची होती ती आज राहिली नाही. या दोघांनी भाजप सोबत जाऊन स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला आहे.' असं म्हणत माणिकरानवांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर टीका केली.

आघाडीसाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला -

देशातील परिस्थिती पाहून काँग्रेसने पुढाकार घेवून आघाडी‌ केली. त्यामुळे आघाडीत कमी जास्त होऊ शकते. सर्वांना सोबत घेवून जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे. शिवसेना व काँग्रेस नेते एकत्र बसून सांगली बाबत निर्णय घेतील. शिस्तीच्या बाहेर कोणी जाणार नाही, असेही ते म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com