

Shivajirao Adhalrao Patil statement : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या बदलाचे पडसाद आता पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर इथं उमटू लागले आहेत. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील चांगलेच संतापले आहेत.
पूर्वनियोजित पद्धतीनेच रेल्वेचा मार्ग व्हावा, यासाठी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली असून, रस्त्यावर देखील उतरण्याच्या तयारीत आहेत. या बैठकीत शिवाजीरावांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. 'विमानतळ गेलं, रेल्वेही गेली, हायवे अपूर्ण! मग आम्ही प्रवास काय बैलगाडीतून करायचा का?' असा प्रश्न केला.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग शिर्डी केला आहे. यावरून संगमनेरमध्ये संतापाची लाट पसरली आहे. काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे, आमदार अमोल खताळ यांनी रेल्वे मार्गासाठी जनआंदोलन उभारलं आहे. हीच रेल्वे अकोले इथून जावी यासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डाॅ. किरण लहामटे देखील आक्रमक आहेत. अकोल्यात यासाठी रास्ता रोको देखील झालं. या रेल्वे मार्गासाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात देखील पडसाद उमटले.
आता या रेल्वे मार्गासाठी पुण्यातील शिरूर, जुन्नर इथं देखील महायुतीसह (Mahayuti) विरोधी पक्षातील नेत्यांनी आंदोलन उभारण्याची तयारी केली आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थित मंचर इथं बैठक देखील झाली. खेड–आंबेगाव–जुन्नर मार्गाने रेल्वे व्हावी, ही ठाम मागणी या बैठकीत नेत्यांनी एकमुखाने ठराव केला.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं खोडद इथल्या जीएमआरटी प्रकल्पाला अडथळा होत असल्याने मार्ग बदलल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी आपण नेते पर्यायी उपाय सुचवून, तसंच सुरूवातील सनदशीर मार्गाने केंद्र आणि राज्य सरकार विनंती करू, रेल्वे जुन्याच मार्गाने आली तर ठीक, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारू, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
नाशिक-पुणे रेल्वे मार्ग बदलण्यावरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी संताप व्यक्त केला. यापूर्वी विमानतळ गेलं, आता रेल्वेही गेली आणि हायवेचा मार्ग अजूनही अपूर्ण! मग आम्ही प्रवास काय बैलगाडीतून करायचा का? असा खडा सवाल सरकारला थेट केला.
पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलल्यानं चाकण–खेड–आंबेगाव–जुन्नर भागातील नागरिकांत संताप उसळला आहे. राज्य आणि केंद्र सरकारला या भागातून तब्बल दीड लाख कोटींचं महसूल उत्पन्न मिळत असताना, विकास प्रकल्प मात्र हातातून निसटत आहे. सरकार जर आमच्यावर अन्याय करत असेल, तर आम्ही सत्ता पाहणार नाही. आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आमची बांधिलकी लोकांशी आहे, असा थेट इशारा आढळराव पाटलांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.