

Baramati Varkari Death : पंढरपूरच्या आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी जेजुरी परिसरात वारकऱ्यांच्या दिंडीत ट्रक घुसल्याने मोठा अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच, आता बारामतीत आणखी एका भीषण अपघातात एका वारकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
बारामतीमध्ये बुधवारी रात्री भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने वारकऱ्याला जोरदार धडक दिली. या हा अपघात इतका भीषण होता की वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचं नाव विष्णू रामचंद्र पवार (वय ६७) असं आहे.
या घटनेमुळे वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी जेजुरी परिसरातही वारकऱ्यांच्या दिंडीला वाहनाने धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता.
ही घटना ताजी असतानाच आता बारामतीत झालेल्या या अपघातामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
तर दुसरीकडे वारीच्या मार्गावर वारकऱ्यांची मोठी गर्दी असताना भरधाव वाहनांवर नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि पोलीस बंदोबस्त अधिक प्रभावी करण्याची गरज असल्याची मागणी केली जात आहे.