PMC Elections : 'भाजप'साठी 'सेफ गेम', 'राष्ट्रवादी'साठी 'डेंजर झोन'! पुणे प्रारूप प्रभागरचनेवर संघर्ष कायम
PMC Election : पुणे महापालिकेची प्रारूप प्रभागरचना ही भाजपसाठी अनुकूल ठरल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात न घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अंतिम प्रभागरचनेत राष्ट्रवादीला थोडासा दिलासा मिळेल, अशी शक्यता होती. मात्र काही किरकोळ बदलांशिवाय मोठा फरक झालेला नाही.
राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर केल्यानंतर मध्यवर्ती पेठांमध्ये फारसा बदल झालेला नाही; परंतु उपनगरांमधील प्रभागांमध्ये मोठी उलथापालथ झाली. भाजपचे प्रभाग सुरक्षित राहिले, तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणी निर्माण झाल्या. वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला मतदारसंघांतील राष्ट्रवादीची घडी विस्कटली.
माजी महापौर दत्ता धनकवडे यांचा भाग पाच प्रभागांमध्ये विभागल्याने त्यांना उमेदवारीसंदर्भात संभ्रम निर्माण झाला. राष्ट्रवादी शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रभागातील टिंगरेनगर गल्ली क्रमांक १४, बार्माशेल हा भाग विमाननगरला जोडण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबासाठी प्रभाग सुरक्षित करता आला नाही, तर टिंगरे विरोधक मुळीक आणि पठारे यांना त्याचा लाभ झाला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांनाही याचा परिणाम जाणवला आहे.
सत्तेत असूनही प्रभागरचनेत लाभ न झाल्याने राष्ट्रवादीत नाराजी होती. पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “रडत बसू नका, निवडणुकीची तयारी करा,” असा सल्ला दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासात घेऊ असे आश्वासन दिले असतानाही, मोहोळ यांनी आपल्या मर्जीने रचना केली, असा आरोप करण्यात आला. राष्ट्रवादीमधील काही जणांना मोहोळांच्या कार्यपद्धतीच तुलना माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्याशी केली होती. त्यामुळे पवार–मोहोळ संघर्ष टाळण्यासाठी काही बदल होतील, अशी चर्चा होती; परंतु राष्ट्रवादीला अपेक्षित फायदा मिळालेला नाही.
बालाजीनगरचा बदल भाजपच्या सोयीचा
बालाजीनगरचा भाग प्रभाग क्रमांक ३९ मधून काढून तो ३८ मध्ये जोडण्यात आला. यातून प्रभाग ३९ भाजपसाठी सुरक्षित झाला, तर ३८ मधील लोकसंख्या १ लाख २३ हजार ९८१ इतकी झाली असून बालाजीनगरची लोकसंख्या जवळपास २५ हजार आहे. त्यामुळे या बदलाचा माजी महापौर धनकवडे यांना नेमका किती फायदा होणार, यावर प्रश्नचिन्ह आहे. शिवसेनेलाही याचा तोटा होण्याची शक्यता आहे.
थिटेवस्तीतील बदल राजकीय रंगात
मांजरी बुद्रुक, केशवनगर या प्रभाग क्रमांक १५ मध्ये खराडीतील थिटेवस्तीचा भाग जोडला गेला होता. स्थानिकांच्या विरोधानंतर हा भाग प्रभाग ४ मध्ये हलवून नैसर्गिक हद्द पाळल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील एका नेत्याच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सोयीसाठी हा बदल केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.