Pune News: येत्या १८ ऑगस्ट पासून मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात सुरू होत आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षकारांना न्याय लवकर मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हा निर्णय करताना कोल्हापुरातील सामान्य जनतेने आनंद व्यक्त केला.
आता पुण्यातही मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, यासाठी राष्ट्रवाजी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पुण्यात खंडपीठ स्थापन करण्यात यावे अशी मागणी सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करणे ही एक न्याय्य, व्यावहारिक, व लोकाभिमुख बाब आहे. तरी या मागणीचा गांभीर्याने विचार करून पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करावी, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे
पुणे जिल्ह्याच्या इंदापूरसारख्या तालुक्यातील दूर अंतरावरील गावाचा विचार केला तर मुंबईपासून ते अंतर तब्बल तीनशे ते साडेतीनशे किलोमिटर अंतरावर आहे. याचा विचार करता कोल्हापूरप्रमाणे पुण्यातही उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे अत्यावश्यक आहे, असे सुळे यांनी म्हटलं आहे.
पुण्यात उच्च न्यायालायचे खंडपीठ व्हावे ही पुणेकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यात नुकतीच कोल्हापूर खंडपीठाला मान्यता मिळल्यामुळे पुणेकरांच्या मागणीने आणखी जोर पकडला असून पुणे बार असोसिएशनतर्फे पुन्हा एकदा पुण्यातल्या समस्त वकिलांनी आपली मागणी पुढे केली आहे. त्यातच आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही ही मागणी केल्याने याला एक वेगळे महत्व प्राप्त झाले असून शासनाला याबाबत सकारात्मक विचार करावाच लागेल, असे मानण्यात येत आहे.
पुणे परिसरात ६० पेक्षा अधिक विधी महाविद्यालये आहेत. या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुणे हे राज्यातील एक प्रमुख आयटी हब व औद्योगिक केंद्र असून व्यवसायिक, औद्योगिक, कामगार व संस्थात्मक खटल्यांची संख्याही तितकीच मोठी आहे.
येथील न्यायालयाच्या इमारती, अधिवक्ता संघटना, मनुष्यबळ, वाहतूक व इतर सुविधांचा विचार करता, पुणे हे खंडपीठासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. न्यायचे विकेंद्रीकरण आणि घरपोच न्याय या तत्त्वांचा विचार करता पुणे हे नैसर्गिक न्यायिक केंद्र ठरते. या सर्व बाबी लक्षात घेता पुण्यात खंडपीठ सुरु करावे, अशी विनंती सुळे यांनी फडणवीसांना केली आहे.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचे आम्ही सर्वजण स्वागत करतो. परंतु आता याच धर्तीवर आता पुण्यात देखील खंडपीठ स्थापन करण्याची गरज आहे. पुणे शहर आणि परिसरातील लोकसंख्या आणि प्रलंबित खटल्यांची संख्या पाहता पुणे खंडपीठाची गरज लक्षात येईल. पुणे शिक्षण, प्रशिक्षण व प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे शहर आहे. याखेरीज येथील बार असोसिएशनने सातत्याने ही मागणी शासनाकडे लावून धरली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुणे येथे करण्यास मंजुरी द्यावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.