

Pune News:'पर्यावरण आणि परिसंस्था वाचवा,' असा संदेश देणारे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक माधव गाडगीळ (वय 83)यांचे आज निधन झाले. पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पत्नी डॉ. सुलोचना गाडगीळ या पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेत हवामानशास्त्रज्ञ होत्या. काही महिन्यापूर्वी त्यांचे निधन झाले.
गाडगीळ हे महाराष्ट्र सरकारच्या कोकण व पश्चिम घाटाच्या पर्यावरण अभ्यासासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी गाडगीळ समितीच्या अनेक शिफारशी सरकारकडे गेल्या होत्या.
माधवराव गाडगीळ यांच्या समितीने कोकण व पश्चिम घाटातील जैवविविधता टिकवण्यासाठी अनेक शिफारशी सरकारकडे केल्या आहेत. वृक्षतोड बंदी कशी करता येईल, नद्या आणि येथील जैवविविधता ही टिकवण्यासाठी काय करावे लागेल? यासाठी महत्त्वाच्या शिफारशी त्यांनी केल्या होत्या.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या साहाय्याने गाडगीळ यांनी पर्यावरणाच्या संरक्षणाची जागृती निर्माण व्हावी यासाठी विविध अभिनव उपक्रमशील प्रयोग केले आहेत. देशातील जैवविविधतेचे सर्वेक्षण आणि संवर्धन या विषयांवर काय काय करता येईल? यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले.
पश्चिम घाटात पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र ( इको सेन्सिटिव्ह झोन ) तयार करण्याची आणि खाणकाम, उत्खनन यांसारख्या हानिकारक प्रकल्पांवर बंदी घालण्याची शिफारस त्यांनी केली होती. त्यामुळे या अहवालावर व्यापक चर्चा झाली. काही राज्यांकडून विरोध झाला. त्यानंतर पुन्हा डॉ. गाडगीळ समितीचा अहवाल मान्य न करता पश्चिम घाटाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.
डॉ. गाडगीळ यांनी प्रत्यक्ष घाटात फिरून पाहणी करून संबंधित अहवाल केला होता. त्यामुळे हा अहवाल आणि त्यातील शिफारशी यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी लोक चळवळ निर्माण केली. त्यांनी भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था, भारतीय विज्ञान अकादमी आणि पर्यावरणाशी संबंधित विविध राष्ट्रीय समित्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. गाडगीळ यांच्या निधनाने देशातीलच नव्हे तर जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ गमावल्याची भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून व्यक्त होत आहे.
२४ मे १९४२ मध्ये पुण्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. तत्कालीन पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथून जीवशास्त्राचे पदवी शिक्षण त्यांनी घेतले. हार्वर्ड विद्यापीठातून मॅथेमॅटिकल इकॉलॉजी विषयात त्यांनी पीएच.डी मिळवली. ते हार्वर्ड विद्यापीठाच्या आयबीएम संगणन केंद्राचे आणि शिवाय उपयोजित गणित शास्त्रशाखेचे फेलो आहेत.हार्वर्ड विद्यापीठात ते जीवशास्त्र शिकवीत असत.
डॉ.गाडगीळ यांनी जैवविविधता संवर्धन, लोकसहभागातून नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या विषयांवर मोलाचे संशोधन आणि लेखन केले.
१९७३ ते २००४ पर्यंत डॉ. गाडगीळ बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापक होते. त्यांनी तेथे ’सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस’ची स्थापना केली.
अमेरिकेतील स्टॅनफर्ड आणि बर्कले विद्यापीठांचे ते पाहुणे प्राध्यापक होते. त्यांच्या पत्नी डॉ. सुलोचना गाडगीळ या पुण्यातील भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेत हवामानशास्त्रज्ञ होत्या. काही महिन्यापूर्वी त्यांचे निधन झाले.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने २०१०मध्ये पश्चिम घाटाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी डॉ. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांचा सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर केला होता. हा अहवाल पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने मैलाचा दगड मानला जातो.
डॉ. गाडगीळ यांना भारत सरकारकडून 'पद्मश्री ' आणि 'पद्मभूषण ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील पर्यावरणविषयक मुद्द्यांवर डॉ. गाडगीळ यांनी दिलेल्या योगदानाची दखल संयुक्त राष्ट्रांनी देखील घेतली.
डॉ. गाडगीळ यांना २०२४ मध्ये यूएनईपीचा 'चॅम्पियन ऑफ द अर्थ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. "सहा दशकांची वैज्ञानिक कारकिर्दीत डॉ. माधव गाडगीळ यांचा प्रवास हार्वर्ड विद्यापीठाच्या सभागृहांपासून ते भारत सरकारच्या उच्चपदापर्यंत झाला. पण या संपूर्ण प्रवासात डॉ. गाडगीळ यांनी स्वतःला 'जनतेचा वैज्ञानिक'च मानले", अशा शब्दांत 'यूएनईपी'च्या निवेदनात डॉ. गाडगीळ यांना गौरव केला आहे.
१९८६ ते १९९० या काळात भारताच्या पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार मंडळाचे सदस्यत्व
१९९८ ते २००२पर्यंत जागतिक पर्यावरण सल्लागार समितीचे सभासदत्व
भारतीय विज्ञान अकादमीची आणि थर्ड वर्ल्ड अॅकॅडमी ऑफ सायन्सेसची फेलोशिप.
अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान प्रबोधिनीचे परदेशातील सदस्यपद
ब्रिटिश आणि अमेरिकन इकॉलॉजिकल सोसायटींचे मानद सदस्यत्व
जीवशास्त्रांसाठीचा 'शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार'
विक्रम साराभाई पुरस्कार
ईश्वरचंद्र विद्यासागर पुरस्कार
हार्वर्ड विद्यापीठाचे शतवार्षिक पदक व्होल्व्हो आंतरराष्ट्रीय पारितोषिक (२००३)
कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार
उष्णकटिबंधीय जीवशास्त्र आणि त्याचे संरक्षण या विषयांवर केलेल्या संशोधनात्मक कामासाठी असोसिएशन फॉर ट्रॉपिकल बायॉलॉजी अँड कॉन्झर्व्हेशन संस्थेची मानद फेलोशिप (२०१०)
पर्यावरणशास्त्रातील योगदानाबद्दल सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचा २०१५चा 'टायलर पुरस्कार'
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.