Pimpri News : पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभेच्या लढतीकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. त्यामुळे तेथील दोन्ही पवारांचे उमेदवार हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातून त्यांच्या जोरदार कलगीतुरा सध्या सुरु आहे.
दरम्य़ान, शनिवारी भोसरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao adhalrao) यांनी कट्टर राजकीय विरोधक, महाविकास आघा़डीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर पुन्हा तोफ डागली. २०१९ ला खासदार झाल्यावर कोल्हे मतदारसंघात फिरलेच नाहीत. त्यांचा लोकांत संपर्क नाही. हा पेटता मुद्दा असून तो झाकण्यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यावर टीका करीत आहेत, असे आढळराव म्हणाले.
आढळरावांवर सध्या कोल्हेंनी जोरदार टीका करीत आहेत. त्यावर ते सध्या काहीही बडबडत सुटलेत, त्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही, असे आढळराव यावेळी म्हणाले. कोल्हेंनी गेल्या पाच वर्षात एक पै चा निधी कोल्हेंनी आणला नाही, असा आरोपही त्यांनी केला. मी, मात्र पराभवानंतर सुद्धा लोकांतच असून काम करीत आहे,असा टोमणा त्यांनी कोल्हे यांना मारला.
यावेळी आतापर्यंतचे माझ्या सर्व लीडचे रेकॉर्ड तोडून मी निवडून येणार आहे, असा दावा त्यांनी केला. आमचे लक्ष विकासावर असून त्यांचे (कोल्हे) ते सगळे भरकटवण्यावर आहे, त्यामुळे अस्तित्वात नसलेले मुद्दे काढून ते निवडणुकीच्या मुख्य प्रश्नांना बगल देत आहेत, असा पलटवार आढळरावांनी केला.
ही आपली शेवटची निवडणूक आहे, या आढळरावांच्या भावनिक विधानावर निवडणुकीआधीच त्यांनी पराभव मान्य केला, अशी बोचरी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली होती. त्याचा समाचार घेताना मी चार निवडणुका लढविल्या असून ही पाचवी आहे. आयुष्यभर निवडणुका लढवायच्या की नाही, हे मी ठरविणार,असे सणसणीत प्रत्युत्तर आढळरावांनी कोल्हेंना दिले.
भावनिकतेसाठी नाही, रस्ते, रेल्वे प्रकल्पांसाठी ५० हजार कोटी रुपये केंद्रातून आणून हे प्रकल्प पूर्ण करुनच पाच वर्षांनी थांबायचंय या हेतूने शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य केले. त्याचा विपर्यास करून माझ्यासाठी भावनिकतेचा हा मुद्दा असल्याचा चुकीचा अर्थ कोल्हेंनी काढला, असे आढळराव म्हणाले.