पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पाच वाजून 10 मिनिटांनी (ता.१५) पुण्यात एका खासगी रूग्णालयात वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. त्यांना न्यूमोनिया झाला होता. गेल्या काही दिवसांपासून रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.त्यांच्या मागे दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. आज सकाळी साडेदहा वाजता वैंकुठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुरंदरेंना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ''शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (shivshahir babasaheb purandare) यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,''अशा शब्दात शरद पवारांनी (Sharad Pawar)त्यांना श्रद्धांजली वाहली.
एक अध्याय पडद्याआड : अजित पवार
''ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी आहे. महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेलं त्यांचं व्यक्तिमत्वं होतं. लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो.” अशा शब्दात अजित पवार यांनी पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
घरात तोल जाऊन पडल्याने २६ ऑक्टोबरला पुरंदरेंना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाचे निदान झाले. त्यावर उपचार सुरू होते. मात्र, गेल्या दोन दिवसात त्यांची प्रकृती खालावली होती. रविवारी त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. ओघवत्या, लालित्यपूर्ण वत्कृत्त्वाने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र महाराष्ट्रासमोर उभे केले आहे.
ऑगस्ट २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने गौरविले आहे. शिवचरित्राच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रात घरोघरी पोचले. त्यांचे ‘राजा शिवछत्रपती’ पुस्तकामुळे देशभरात छत्रपतींच्या चरित्राची पारायणे केली गेली. ‘जाणता राजा’ या महानाट्याने इतिहास घडवला. जगभरात प्रचंड लोकप्रियता आणि आदर प्राप्त केला. वयाची नव्वदी उलटल्यानंतरही त्याच्या वाणीतील आणि विचारांतील उत्साह कायम होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.