पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकची गरज
अनिल सावळे : सरकारनामा ब्यूरो
पुणे : जम्मू काश्मीरमधील हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा कुटील डाव असून, जम्मू काश्मीरमध्ये उद्योजक आणि नागरिकांवर दहशतवाद्यांकडून हल्ले होत आहेत. त्यामुळे पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करून आरपारची लढाई करावी लागेल, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला.
पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवून पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात द्यावा.अन्यथा पाकिस्तानशी आरपारची लढाई करावी लागेल,असेही आठवले म्हणाले.भारत-पाकिस्तानच्या मुद्यांसह महापालिका निवडणुकांच्या विषयांवर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘ भारत- पाकिस्तान क्रिकेट मॅच होऊ नये, असे माझे आणि रिपब्लिकन पक्षाचे मत आहे. पाकिस्तानबरोबर खेळू नये, याबाबत गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र आणि क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी जय शहा यांना सांगेन. खेळामध्ये राजकारण आणू नये हे खरे आहे, पण अशा परिस्थितीत पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळू नये.’’
महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याची आम्हाला गरज नाही. केंद्रीय तपास यंत्रणा देशाच्या ताब्यात असल्या तरी मोदी सरकार अशा सूचना देत नाहीत. राज्यातील सरकार अस्थिर करायचे असते तर एक वर्षांपूर्वीच केले असते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत आपल्याला कायम आदर आहे. परंतु केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याच्या पवार यांच्या आरोपाशी मी सहमत नाही.
राज्यातील महापालिका निवडणुकीत आम्ही भाजपसोबत राहणार आहे. पुण्यात महापौरपद आणि मुंबईमध्ये उपमहापौर मिळाले पाहिजे. आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यात 15 ते 20, तर मुंबईमध्ये 30 ते 35 जागा मिळाल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह राहील. मात्र, महापालिका निवडणूक भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार की रिपब्लिकन पक्षाच्या हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
Edited By : Umesh Ghongade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.