Balasaheb Thackeray : मुंबईत फक्त बोलणारे भेटतात.. पण मराठवाड्यात लढणारे! बाळासाहेब ठाकरेंनी एकाच वाक्यात व्यक्त केलं होतं प्रेम!
Chhatrapati Sambhajinagar : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मराठवाड्यावर गारूड होते. मुंबई आणि महाराष्ट्रातील क्वचितच बाळासाहेबांएवढे प्रेम या भागातील लोकांनी केले असेल. बाळासाहबे ठाकरे आणि मराठवाड्याचे एक भावनिक नाते होते. बाळासाहेबांनी हाक द्यावी आणि मराठवाड्याने त्यांच्या हाकेवर जीव ओवाळून टाकावा, असे हे बंध. बाळासाहबे ठाकरे मराठवाड्यातील लोकांबद्दल नेहमी सांगायचे, की मुंबईत बोलणारे खूप मिळतात, पण मराठवाड्यात लढणारे आहेत.
औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर करण्याचा विषय असो, की मग मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचे आंदोलन अशा अनेक प्रसंगातून बाळासाहेबांचे मराठवाड्यातील लोकांबद्दल एक ठाम असे मत बनले होते. मराठवाडा आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरशी बाळासाहेब ठाकरे यांचं नातं हे केवळ राजकीय नव्हतं, तर ते इतिहास, स्वाभिमान आणि संघर्षाचं प्रतीक होतं. आज जेव्हा औरंगाबादचं अधिकृत नाव छत्रपती संभाजीनगर झालं आहे, तेव्हा या निर्णयामागे बाळासाहेबांनी उभा केलेला वैचारिक संघर्ष आणि भूमिका महत्वाची ठरते.
मराठवाडा हा बरीच वर्ष काँग्रेसच्या प्रभावाखाली राहिलेला भाग. दुष्काळ, पाणीटंचाई आणि मागासलेपणा ही या प्रदेशाची ओळख होती. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाड्याकडे जेव्हा लक्ष दिले तेव्हा राजकीय फायदा, वोट बँकेपेक्षा या भागातील लोकांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले. 'मराठवाडा शांत नाही, तो दुर्लक्षित आहे. आणि दुर्लक्षित माणूस एक दिवस उठतोच' हा विश्वास त्यांनी निर्माण केला. याच विचारातून शिवसेनेची आक्रमक संघटनात्मक मांडणी मराठवाड्यात झाली.
औरंगाबाद नव्हे, संभाजीनगर
1980–90 च्या दशकात, जेव्हा औरंगाबाद नावावर फारशी उघड चर्चा नव्हती, तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा ठामपणे प्रश्न उपस्थित केला. अन्याय आणि अत्याचाराचे प्रतिक असलेल्या औरंगजेबाचे नाव या शहराला कशासाठी? असा रोखठोक सवाल त्यांनी केला. या ऐवजी बलिदान, स्वाभीमान आणि प्रतिकाराचे प्रतिक असलेल्या संभाजी महाराजांच्या नावाने हे शहर ओळखले जावे, हा विचार सर्वप्रथम बाळासाहेबांनी मांडला. एका जाहीर सभेत औरंगाबाद नव्हे, संभाजीनगरच, असे ठणकावून सांगितले आणि तेव्हापासून हे नाव रुढ झाले. आज तीस वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर हे जे अधिकृत नाव या शहराला मिळाले त्याचा पाया बाळासाहेब ठाकरे यांनी रचला होता.
नामांतर आंदोलन अन् बाळासाहेब
मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाच्या काळात वातावरण पेटले होते. 'घरात नाही पीठ, कशाला हवं विद्यापीठ' या बाळासाहेबांच्या विधानाने पेटलेले आंदोलन भडकले. त्या काळात बाळासाहेबांना शहरात येण्यापासून रोखण्यात आले. या विषयावर भडक भूमिका घेऊ नका, असा दबाव त्यांच्यावर होता, पण तो झुगारत 'इतिहासाशी तडजोड केली, तर स्वाभिमान उरत नाही' असे म्हणत त्यांनी आपली रोखठोक भू्मिका मांडली होती. याचा फटकाही शिवसेनेला संघटनात्मक बांधणीत बसला, पण बाळासाहेबांनी याचा फारसा विचार केला नाही.
हिंगोली, परभणी, नांदेड, बीड या भागांतील सभांनंतर बाळासाहेब अनेकदा म्हणायचे 'मुंबईत बोलणारे खूप मिळतात, मराठवाड्यात लढणारे मिळतात'. बाळासाहेब ठाकरेंचे मराठवाड्यावर प्रेम होते आणि येथील लोकांचा त्यांच्यावर विश्वास. यामुळेच मराठवाड्यातील शिवसैनिक बाळासाहेबांच्या आदेशावर रस्त्यावर उतरून आक्रमकपणे आंदोलनं करायचे. मोर्चे, आंदोलनं आणि स्थानिक प्रश्नांवर थेट संघर्ष ही शिवसेनेची ओळख बनली होती.
दुष्काळ आणि शेतकरी प्रश्नावर आक्रमक भूमिका
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक वेळा सरकारवर थेट टीका केली. बीडमधील एका सभेत त्यांनी 'मराठवाडा तहानलेला असताना मंत्री पाण्यात बसून सत्ता भिजवत आहेत'अशी खास ठाकरे शैलीत तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. बाळासाहेब ठाकरे यांचं मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरवर असलेलं प्रेम कधीही विसरता येणार नाही. आज संभाजीनगर नाव उच्चारलं जातं, तेव्हा हा लढा बाळासाहेबांचा होता याची पदोपदी जाणीव होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

