बीड ः जिल्ह्यात दाखल होताच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पोलिस, प्रशासन आणि कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्या यंत्रणांवर जोरदार हल्ला चढवला. बीड जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी माफिया तयार झाला आहे, पोलिसांचा धाक राहिला नाही. प्रशासन दावणीला बांधलेले असल्याने खोट्या केसेस दाखल केल्या जात आहेत. ऍट्रॉसिटी कायदा एका विशिष्ट वर्गाच्या सुरक्षेसाठी आहे, मात्र त्याचा दुरुपयोग होतोय, असा आरोप करत पंकजा मुंडे यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारभारावर नाव न घेता प्रश्न चिन्ह उपस्थित केले.
आम्ही सत्तेत आलो, तेंव्हा अत्याचार विरोधात पोलिसांचे पथक स्थापन केले होते, असे सांगत पंकजा यांनी जिल्ह्यातील नुकत्याच घडून गेलेल्या राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने टीका केली. दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने पंकजा मुंडेंनी सावरगाव घाटच्या भगवान भक्तीगडाची पहाणी केली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना जिल्ह्यातील राजकीय परिस्थीतीपासून ते राज्य, केंद्रातील प्रश्न, नेत्यांच्या टीका यासह अनेक प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली.
सुरूवातीलाच त्यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या, उद्या जयंत पाटील परळीत आहेत. मी बीडच्या एसपींना विचारणार आहे. आम्ही दर्शनाला गेलो तर गुन्हे दाखल झाले. राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वाढदिवस भव्यता दाखवून साजरे करण्यात आले, केक कापले गेले. लोकांना उपचाराला पैसे नाहीयेत आणि इथे भव्यता दाखविली जातेय.
कोरोनाच्या मुळे गतवर्षी मला ऑनलाईन दसरा मेळावा घ्यावा लागला होता. त्यावेळी पोलिसानी गुन्हा देखील दाखल केला होता. मंदिर खुले होतील अशी मी आता गुड न्यूज ऐकली आहे. मात्र सरकारचे नियम बदलतील का ? हे आम्ही पाहतोय. तरीही मी दर्शनाला जाणार आहे. दर्शनाला जाण्यासाठी कुठलीही बंदी नाही. भगवान बाबा आणि मेळाव्याला जोडले गेलेले सर्व भक्त आणि भाविक दर्शनासाठी येतील.
अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख करतांनाच शेतकऱ्यांची साद या सरकारच्या कानापर्यंत जात नाही. आज मी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. जेंव्हा तुमचं सरकार होत तेंव्हा मदत मिळायची, आता या सरकारमध्ये मिळत नाही, अशा व्यथा शेतकऱ्यांनी माझ्यासमोर मांडल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. दोन वर्षांपासून विमा मिळत नाही, अद्याप नुकसानीचे पंचनामे नाहीत. आज मदत व पुनर्वसन मंत्री बीड जजिल्ह्यात आले होते. त्यांनी सरसकट मदतीची घोषणा केली पाहिजे, सरकारने निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या.
स्त्रियांचं सबलीकरण आणि प्रश्न सोडविण्यासाठी दोन दिवशीय अधिवेशन बोलावले पाहिजे. राज्यपालांनी तसे पत्र मुख्यमंत्री यांना लिहिले आहे, याचा उल्लेखही पंकजा यांनी केला. जागतिक कन्यादिनाचा संदर्भ देत पंकजा म्हणाल्या, कन्यांची संख्या बीड जिल्ह्यात वाढली आहे, ही अभिमानाची बाब आहे. बालविकास मंत्री पद असताना जी आम्ही कामे केली, त्याचे फळ आता मिळाले आहे. माझी कन्या भाग्यश्री ही संकल्पना मी राबविली. आमच्या सरकारच्या काळातच मुलींची संख्या वाढली आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर बोलतांना संजय राऊत काय म्हंटले हे मी ऐकले नाही. परंतु मोदीजी हे स्वत;ला प्रधान सेवक म्हणवतात . ते कधीच अशा गोष्टीकडे लक्ष देत नाही. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना जो सन्मान मिळाला, त्यापेक्षा परमोच्च सन्मान मोदीजींनी मिळविला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी देखील मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत म्हणून हा सन्मान असल्याचे म्हटले आहे. उद्धव ठाकरे दिल्लीत कोणत्या कारणासाठी भेटले हा त्यांचा विषय असल्याचे सांगत पंकजा यांनी याविषयावर अधिक बोलणे टाळले.
महिलांवरील वाढते अत्याचार संताप आणणारे आहेत. सोनपेठमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. बीड जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी माफिया तयार झाला आहे. पोलिसांचा धाक राहिला नाही, प्रशासन दावणीला बांधलेले असल्याने खोट्या केसेस दाखल होतात. ऍट्रॉसिटी कायदा एका विशिष्ट वर्गाच्या सुरक्षेसाठी आहे, मात्र त्याचा दुरुपयोग होतोय, अशी टीका देखील पंकजा मुंडे यांनी केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हा संदर्भ देत आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, जयंत पाटील हे जेष्ठ मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा परिस्थिती पाहून ते नक्कीच चांगल पॅकेज जाहीर करतील, अशी अपेक्षाही पकंजा यांनी व्यक्त केली. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार हे देखील बीडला येऊन गेल्याचा उल्लेख करत पकंजा मुंडे म्हणाल्या सध्या पाण्यात तर शेती आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
देव पाण्यात घालून बसण्याची आवश्यकता नाही, जो कर्मावर विश्वास ठेवतो ते या गोष्टी करत नाहीत. सत्ता जाणार नाही हे म्हणतात, आणि सत्ता जाणार हे ते म्हणतात. यात लोक दुर्लक्षित होऊ नये. त्यामुळे जे ते आपल्या भूमिकेत कायम राहिले तर लोकांचं भलं होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.