![raju shetti](http://media.assettype.com/sarkarnama%2F2024-06%2F528c92c6-b8fb-466b-948c-2300aa0802f4%2Fraju_shetti__2_.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Kolhapur News, 7 June : शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता आणि योग्य मोबदला मिळवून देण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हात आहे. हा राज्यातील शेतकरी नाकारू शकत नाही. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनाच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी नाकारल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीत 'एकला चलो'ची घेतलेली भूमिका शेट्टींना चांगलीच महागात पडली आहे. शिवाय विधानसभेला बालेकिल्ला असणाऱ्या शिरोळ आणि हातकणंगले शाहूवाडीमध्ये स्वाभिमानीची वाट बिकट बनली आहे.
2009 पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे खासदार पद असल्याने संसदेत शेतकरी संदर्भात प्रश्न मांडणारा नेता म्हणून शेट्टी यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून चालून आलेली संधी राजू शेट्टींनी डावलली. त्याचाच फटका स्वाभिमानीच्या पुढील चळवळीला बसला आहे. एकंदरीत निकालावरून हेच स्पष्ट होत आहे.
हातकणंगले लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी सोबत येऊन उमेदवारी घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी पायघड्या घातल्या होत्या. मात्र, या पायघड्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना गुंडाळायला लावून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी 'एकला चलो'ची भूमिका घेतली होती. शिवाय त्यांच्या 'एकला चलो'च्या भूमिका मागे मागील दोन लोकसभा निवडणुकीतील पूर्वानुभव होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील साखर कारखानदारांनी देखील शेट्टींना विरोध केला होता. तरी देखील स्वाभिमानीला महाविकास आघाडीत घेण्यात वरिष्ठ नेत्यांनी रस दाखवला. शेट्टींनी तो नाकारत स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले.
सुरुवातीला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना एकतर्फी निवडणूक मारेल, असा अंदाज होता. मात्र, महाविकास आघाडीने या ठिकाणी माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी देऊन शेट्टींची अडचण केली. तरीही हातकणंगलेतील निवडणूक शेट्टी हे एकतर्फी मारतील, असेच वातावरण होते. सामान्य माणूस आपल्यासोबत राहील, हा आत्मविश्वास शक्ती शेट्टींना नडला. सामान्य माणूस तर सोडाच शेतकऱ्यांनी देखील यंदाच्या निवडणुकीत शेट्टींना यांना नाकारले आहे.
ऊस पट्ट्यात अधिक मते मिळण्याचा अंदाज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींना होता. शिवाय होम पिचवर शिरोळवर देखील अपेक्षित असं यश मिळेल, असा तर्क शेट्टींच्या यांच्या कार्यकर्त्यांना होता. कारण, 2009 आणि 14 च्या लोकसभा निवडणुकीत याच बळावर ते संसदेत पोचले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या प्रतिसाद पाहता होम पिचवरच त्यांना नाकारल्याचे चित्र आहे. तर विधानसभा निवडणुकीला देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बालेकिल्ला असणाऱ्या शाहूवाडी, हातकणंगले आणि शिरोळ मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला चांगले दिवस येतील याची शक्यता कमीच आहे.
हातकणंगले मतदारसंघ- (2024)
हातकणंगले -
धैर्यशील माने-1,05,513
सत्यजित पाटील-88,020
राजू शेट्टी - 35,706
शाहूवाडी -
धैर्यशील माने- 84,503
सत्यजित पाटील- 1,03,500
राजू शेट्टी - 14,574
इचलकरंजी -
धैर्यशील माने-1,10,594
सत्यजित पाटील-71,422
राजू शेट्टी - 10,495
शिरोळ -
धैर्यशील माने-78,060
सत्यजित पाटील-74,813
राजू शेट्टी - 61,786
इस्लामपूर -
धैर्यशील माने- 58,944
सत्यजित पाटील-76,425
राजू शेट्टी - 38,806
शिराळा -
धैर्यशील माने-80,720
सत्यजित पाटील-90,201
राजू शेट्टी - 17,499
( Edited By : Akshay Sabale )
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.