Beed News : राष्ट्रवादीतील ‘बंडोबा’ना लगाम घालण्याच्या हिशेबाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आक्रमक होऊन लोकांत जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दोन्ही बंडात त्यांना भक्कम साथ देणाऱ्या कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्या बीडमध्ये जाऊन पवारांनी बंडखोरांना थेट इशारे दिले. ‘चुकीच्या लोकांना आवरण्याची वेळी असल्याचे सांगून पवारांनी मराठवाड्यात धनंजय मुडेंनाही रोखण्याचा ‘मेसेज’ दिल्याचे मानले जात आहे. त्यातून पवारांनी अनेकांचे ‘बंदोबस्त’ करण्याचे संकेतच दिले.
बीडमध्ये पवारांची सभा होणार, त्याकरिता आमदार संदीप क्षीरसागरांनी प्रचंड तयारी केली, या सभेला लोकांनीच गर्दी केली, तेव्हा पवारांची तोफ धडाडणार, मुंडेंचा समाचार घेणार ? या साऱ्यांची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. ती तितकीच अजित पवारांच्या गटातही होती. त्यातही धनंजय मुंडेंचे; तर या सभेकडे बारीक लक्ष असेन, असे बोलले गेले. प्रत्यक्षात मात्र, धनंजय मुंडेंनी पवारसाहेबांची सभा ऐकलीच नाही. सभेआधीच बैठक बोलावून मुंडे ‘बिझी’ राहिले. त्यासाठी सकाळी अकरा-साडेअकरा वाजल्यापासूनच मुंडे कृषी खात्यातील अधिकाऱ्यांच्या गराड्यात होते. पवारसाहेब हे दैवत आहेत असे मुंडेंनी अनेकदा सांगितले आहे. मात्र, हे दैवत बीडमध्ये येऊनही मुंडेंनी साधे टीव्ही पाहिले नाही, त्यांचे भाषण ऐकले नाही. त्यामुळे मुंडें दैवताला विसरले का ? असा सवाल विचारला जात आहे.
तिकडे पवार सभेच्या ठिकाणी आले, तेव्हाच दुपारी दोन वाजता मुंडेंनी हिंगोलीतील बाजार समितीची बैठक बोलावली. त्यानंतर लगेचच तीन वाजता खतांच्या पुरवठ्याची बैठक घेतली. त्यावरच न थांबत ना मुंडेंनी पुन्हा चार वाजता आणखी एक बैठक बोलावून मंत्रालयातच थांबले. जिथे बैठक घेतल्या तिथे ‘टीव्ही’ नव्हता. त्यामुळे खरोखरीच धनंजय मुंडेंनी पवारांची सभा ऐकली नाही. सभा ऐकली नसल्याचे मुंडेंच्या कार्यालयातून सांगण्यात आले. मात्र, सभेच्या गर्दीपासून कोणाची भाषणे कशी झाली, ते बोलले, त्यावर लोकांची प्रतिसाद कसा होता, याची सविस्तर माहिती घेण्यासाठी मुंडेंचे समर्थक बीडमध्ये तळ ठोकून बसल्याचेही सांगण्यात येत आहे.
पवारांची बीडमध्ये मोठी सभा घेऊन मुंडेंना आव्हान देण्याची रणनीती आमदार क्षीरसागरांची होती. त्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून क्षीरसागरांनी जोरदार तयारी केली होती. सभेला गर्दी जमवून क्षीरसागर आणि स्थानिक नेत्यांनी आपण मुंडेंच्या तुलनेत कुठेच कमी नसल्याचे पवारांना दाखवून दिले. क्षीरसागरांच्या प्रयत्नां यश आल्याचेही बोलले जात आहे.