
Electoral Journey from Bihar : बिहारमध्ये जन्मलेल्या निशिकांत दुबे यांनी नुकतीच मराठी लोकांविषयी गरळ ओकली. ते बरंच काही बोलून गेले. मराठी लोक, महाराष्ट्र कसा इतर भाषिकांमुळे संपन्न झालाय, याकडे त्यांचा रोख होता. एवढेच नाही तर महाराष्ट्राबाहेर या, आपटून आपटून मारू, असे म्हणण्याचे धाडसही त्यांनी केले होते. कदाचित त्यांनाही हे माहिती असेल की त्यांच्या जन्माआधी एका मराठी नेत्यानं बिहारचं मैदान मारलं होतं. एकदा नव्हे तर चारवेळा ते बिहारमधून खासदार निवडून येत संसदेत केले होते.
मधु लिमये असं त्यांचं नाव. बिहारच्या राजकारणात मधु लिमये हे नाव अजरामर आहे. त्यांच्या उल्लेख केल्याशिवाय बिहारच्या राजकारणाचा इतिहास पुढे जाऊच शकत नाही. एक मराठी व्यक्ती बिहारमध्ये जाऊन तेथील लोकांवर आपली कशी छाप पाडू शकतो, हे त्यांनी दाखवून दिले होते. देशाच्या राजकारणात अशी क्वचितच उदाहरणे आहेत. राज्यसभेत अशी अनेक नावे सांगता येतील, पण लोकसभेत एखादाच अपवाद. त्यात मधु लिमये यांचे नाव घेतले जाते.
मधु लिमये यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यावेळी पुण्यात समाजवादी नेते एस. एम. जोशी यांची भुरळ अनेक तरुणांना होती. मधु लिमये हेही त्यांना भेटले अन् तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात झाली. वयाच्या 17 व्या वर्षीच पुणे जिल्हा काँग्रेस सोशलिस्ट पक्षाचे ते सरचिटणीस बनले. समाजवादी विचारसरणीतूनच त्यांनी स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतरही आपल्या राजकारणाची मांडणी केली होती.
मधू लिमये यांनी 1964 मध्ये बिहारमधील मुंगेर मतदारसंघातून लोकसभेची पहिली निवडणूक लढवली होती. संयुक्त सोशलिस्ट पक्षाने त्यांना या निवडणुकीत तिकीट दिले होते. ही पोटनिवडणूक होती. पुढे 1967 च्या निवडणुकीतही त्यांनी याच मतदारसंघातून बाजी मारली. पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी सोशलिस्ट पक्षाच्या तिकीटावर बिहारमधीलच बांकी मतदारसंघातून 1973 मध्ये तिसऱ्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकलीही.
जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाकडून लिमये यांनी 1977 मध्ये चौधी निवडणूक लढवली. बांका लोकसभा मतदारसंघातून ते चौथ्यांचा लोकसभेत गेले. मात्र, ही घोडदौड सुरू असताना त्यांचा दोनदा पराभवही झाला होता. १९७१ च्या निवडणुकीत मुंगेरमध्ये तर 1980 च्या निवडणुकीत बांकामध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्याकाळी समाजवादी विचारसरणीचे बिहारमध्ये एकप्रकारचे वादळ होते.
मधू लिमये या मराठी माणसानेच यांनीच याच विचारधारेची कास धरत तिथे आपला दबदबा निर्माण केला होता. दिल्लीच्या संसेदत पाऊल ठेवताच सत्ताधारी त्यांना हादरून जायचे. पुराव्यानिशी ते सरकारला अडचणीत आणायचे. त्यामुळे दिल्लीत त्यांचा नावाचा चांगलाच दबदबा होता. त्यामुळे बिहारसह लगतच्या राज्यांमध्ये मधु लिमये नावाचे वादळ त्याकाळी घोंघावत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.