
Why AAP and Congress Didn’t Ally : दिल्ली विधानसभा निवडणुकीत यंदा भाजपने अडीच दशकानंतर एक हाती यश मिळवले आहे. तर आम आदमी पार्टीची मात्र सत्तेची हॅटट्रिक हुकली आहे. विशेष बाब म्हणजे काँग्रेसची मात्र शून्याची डबल हॅटट्रिक झाली आहे. खरंतर इंडि आघाडीतील सहकारी पक्ष असणारे आम आदमी पार्टी व काँग्रेस पक्ष लोकसभा निवडणुकीत दिल्लीत एकत्र लढले होते. मात्र हेच दोन्ही पक्ष विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभा ठाकले आणि परिणामी दोन्ही पक्षांचे नुकसान झाले.
मात्र अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) काँग्रेससोबत मिळून हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणूक लढवू इच्छित होते का? आणि हा सगळा खेळ कसं काय बिघडला? याबाबतचा खुलासा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सामाना मधील आपल्या लेखात केला आहे. त्यांनी दिल्लीत आदित्य ठाकरे आणि अरविंद केजरीवाल यांच्यात झालेल्या बैठकीत जी चर्चा झाली, त्याबाबत माहिती दिली आहे. यानुसार केजरीवाल यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसोबत आघाडीचा संपूर्ण प्रयत्न केला मात्र काँग्रेसच्या हट्टीपणामुळे ती शक्य होवू शकली नाही.
आदित्य ठाकरेंबरोबर फिरोजशाह मार्गावरील निवासस्थानी केजरीवालांची चर्चा झाली होती. यावेळी दिल्ली आणि हरियाणाबाबत खुद्द अरविंद केजरीवाल यांनी जी माहिती दिली, ती काँग्रेसच्या आघाडीबाबतच्या धोरणांचा पर्दाफाश करते. या चर्चेत जेव्हा केजरीवालांना विचारले गेल की, जर काँग्रेसोबत(Congress) आघाडी झाली असती तर चांगले झाले असते. मात्र केजरीवालांनी आघाडी होवू दिली नाही, असं सांगितंल जात आहे. यावर केजरीवाल म्हणाले, नाही, मी पूर्णपणे काँग्रेससोबत राहून निवडणूक लढवण्याच्या बाजूने होतो.
केजरीवालांनी कारण सांगताना म्हटले की, ''जेव्हा मी तुरुंगात होतो तेव्हा हरियाणात निवडणूक झाली होती. राघव चढ्ढा हरियाणात काम बघत होते. ते तुरुंगात मला भेटण्यासाठी आले होते. मी त्यांना म्हणालो की, आपल्याला काँग्रेससोबत आघाडी करावीच लागेल. तुम्ही जागा वाटप निश्चित करा.''
केजरीवलांनी पुढे सांगितले की, काँग्रेसने आमच्याकडे यादी मागितली. आम्ही 14 मतदारसंघाची यादी दिली. त्यावर राहुल गांधींनी(Rahul Gandhi) म्हटले आम्ही तुम्हाला सहा जागा देवू. मी राघव चढ्ढा यांना म्हणालो काही हरकत नाही, सहा जागा घ्या. आम्ही दोन पावलं मागे आलो. त्यानंतर राहुल गांधींनी सांगितले की के.सी. वेणुगोपाल यांच्याशी भेटा ते अंतिम करतील.
यावर पुढे केजरीवालांनी सांगितले की, राघव चढ्ढा यांनी के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली. त्यांनी म्हटले सहा जागा शक्य नाहीत, आम्ही चार जागा देवू. तुम्हा आमचे हरियाणा प्रभारी बावरिया यांना भेटा. चढ्ढा परत माझ्याकडे आले. मी म्हणालो, ठीक आहे चार जागा घ्या. परत चढ्ढा बावरिया यांच्याकडे भेटण्यास गेले, तेव्हा त्यांनी चार जागांचा प्रस्तावही धुडकावला. म्हणाले आम्ही तुम्हाला दोनच जागा देवू. मी परत चढ्ढा यांना म्हणालो हरकत नाही दोन जागा घ्या.
खरंतर राहुल गांधी हायकमांड आहे आणि त्यांनी शब्द दिल्यानंतरही आम्हाला सहा जागा मिळाल्या नाहीत. चार जागांवरून दोन जागांवर आले. त्या दोन जागांसाठी राघव चढ्ढा यांनी अखेर भूपेंद्र हुड्डा यांची भेट घेतली, मग त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यातील दोन जागा आम्हाला ऑफर केल्या. ही काँग्रेसच्या आघाडी धर्माची व्याख्या आहे, आम्ही काय करणार? असं घडलं हरियाणात. दिल्लीतही काही वेगळं घडलं नाही. ते भाजपला हरवू इच्छित नव्हते, ते मोदी विरोधी केजरीवालांना हरवू इच्छित होते. हे सर्व सांगताना केजरीवालांचे दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.