श्रीगोंदे, कर्जतच्या जागेसाठी कॉंग्रेसच्या साळुंके, नागवडे ठाम

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी जागावाटप होताना काँग्रेसवर अन्याय होत आहे, अशी भावना नुकत्याच झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. श्रीगोंदे व कर्जत-जामखेड या दोन्ही जागा काँग्रेसला मिळाव्यात, अशी मागणी या वेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे व कॉंग्रेसच्या नेत्या व जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालिका मीनाक्षी साळुंके यांच्यावतीने करण्यात आली.
श्रीगोंदे, कर्जतच्या जागेसाठी कॉंग्रेसच्या साळुंके, नागवडे ठाम

नगर : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी जागावाटप होताना काँग्रेसवर अन्याय होत आहे, अशी भावना नुकत्याच झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली. श्रीगोंदे व कर्जत-जामखेड या दोन्ही जागा काँग्रेसला मिळाव्यात, अशी मागणी या वेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे व कॉंग्रेसच्या नेत्या व जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालिका मीनाक्षी साळुंके यांच्यावतीने करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात आघाडीत या जागा मिळण्याबाबत खल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत जागा वाटप होताना सात-पाच असा पॅटर्न ठरलेला आहे. असे असताना काँग्रेसला मात्र हव्या तशा जागा मिळत नाहीत. श्रीगोंदे हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसकडे होता. मात्र मागील वेळी राष्ट्रवादीने घेऊन आमदार राहुल जगताप यांना उमेदवारी दिली. त्या वेळी सहकारी म्हणून कॉंग्रेसने मदत केली. अशीच परिस्थिती नगर शहरातही होती. काँग्रेसचा मतदारसंघ राष्ट्रवादीने पळविला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसला हवे आहेत. अशीच परिस्थिती कर्जत-जामखेड या मतदारसंघाचीही झाली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांच्यासाठी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे नियोजन होत आहे. काल झालेल्या मुलाखतीत राजेंद्र नागवडे यांनी ही मागणी लावून धरली. ते म्हणाले, श्रीगोंदे हा मूळचा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. गेल्या दोन निवडणुकांत तेथून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सहकारी असलेल्या राष्ट्रवादीचे काम मनापासून केले. त्यामुळे या वेळी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा. त्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांनी पक्ष पातळीवर प्रयत्न करावेत. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी तर यापूर्वीच कर्जत-जामखेड हा मतदारसंघ काँग्रेससाठी मिळावा, अशी मागणी केली होती. काल मुलाखतीच्या दरम्यान त्यांनी वरिष्ठांकडे या जागेसाठी साकडे घातले आहे. मीनाक्षी साळुंके यांना येथून उमेदवारी हवी आहे. गेल्या काही विधानसभा निवडणुकात नगर दक्षिणेकडे काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. नगर शहरातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आहेत, तर कर्जत-जामखेड हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ राष्ट्रवादीचे रोहित पवार मागत आहेत. त्यामुळे काँग्रेसला नगर दक्षिण मतदारसंघात जागा राहिली नाही. हे दोन्ही मतदारसंघांबरोबरच श्रीगोंदे आणि पारनेर हे मतदारसंघ कॉंग्रेसला मिळावेत, अशी मागणी साळुंके यांनी काँग्रेसचे निरीक्षक मोहन जोशी यांच्याकडे केली. त्यामुळे हा जागावाटपाचा तिढा आगामी काळातही सुरूच राहील, अशीच शक्यता आहे. काँग्रेसच्या नाराजांना सोबत घेऊन राष्ट्रवादीला मोठी कसरत करावी लागणार आहे. भाजपच्या उमेदवारांना तोंड देताना काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकदिलाने काम केले, तरच दोन हात करणे शक्य होईल, अन्यथा मतविभाजनाचा फटका आघाडीला बसणार आहे.

मागील वेळी संधी सोडली, आता नाही सोडणार : साळुंके
मागील वेळी मला उमेदवारी मिळत होती. मात्र वरिष्ठांच्या सांगण्यावरून हातची उमेदवारी दुसऱ्याला दिली. आता मात्र आम्हाला संधी हवी आहे. पक्षाने स्थानिक लोकांना संधी द्यायला हवी. आम्ही गेले १२ वर्षे राजकारणात आहोत. मागील वेळेस थांबले, आता थांबण्यास तयार नाही, कर्जत-जामखेडची जागा कॉंग्रेसला मिळून मी उमेदवारी करण्यावर ठाम आहे, असे मत मिनाक्षी साळुंके यांनी `सरकारनामा'शी बोलताना मांडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com