Election News : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभरात शुक्रवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात 13 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 88 जागांसाठी गुरुवारी सरासरी 63 टक्के मतदान झाले, तर महाराष्ट्रातील आठ जागांसाठी सरासरी 60 टक्के मतदान झाल्याचा निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार प्राथमिक अंदाज आहे. राज्यातील मतांची ही आकडेवारी 2019 च्या तुलनेत सरासरी तीन टक्क्यांनी कमी आहे.
दुसऱ्या टप्प्यातील या मतदानात आता पूर्वीप्रमाणे कुठेही लाट जाणवत नाही तर दुसरीकडे शेतीचे प्रश्न तितक्या प्रमाणात मांडले गेले नाहीत. त्यामुळे अगदी संथ अशी निवडणूक,असे वर्णन या लोकसभा निवडणुकीचे केले जात असले तरी मतदारांच्या मनात नेमके काय आहे ? हे ओळखणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे. सध्याच्या परिस्थितीत मतदान केल्यानंतरच मतदार बोलतोय, असे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ( Lok Sabha Election 2024 News)
मराठा आरक्षणप्रश्नी (Martha Reservation) आंदोलन करीत असलेल्या मनोज जरांगे यांचा अंडर करंट या निवडणुकीदरम्यान जाणवतोय. तर दुसरीकडे राम मंदिराचा मुद्दा भाजपच्या कितपत मदतीला येणार त्यासोबतच भाजपच्या (Bjp) विरोधात या निवडणुकीत पहिल्यांदाच विदर्भात काँग्रेसचे (Congress) सर्व गट एकत्र येऊन लढत आहेत, असे वरवरचे दिसणारे चित्र कितपत मतदानात परिवर्तित होणार याकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर तरी या लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण होईल का ? याची उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे.
मतदानाचे एक एक टप्पे पार पडत आहेत. त्या टप्प्यानुसार निवडणुकीतील मुद्दे आता बदलत आहेत. दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसचा जाहीरनाम्याचा उल्लेख करण्यात आला. विशेषतः ज्या स्थानिक मुद्द्यांवर आणि उमेदवारांवर ही निवडणूक लढवली जाते ते मुद्दे निवडणुकीत चर्चेत न आल्याने ही निवडणूक मुद्द्यावरून भरकटली तर जात नाही ना ? असा सवाल यानिमित्ताने केला जात आहे. विदर्भातील शेती मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरीवर्ग चिंतातुर झाला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत तर विरोधक या प्रश्नावरून सरकारला घेरण्याची संधी असताना हे मुद्दे मांडत नसल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
कापूस आणि सोयाबीन यांचे पडलेले भाव याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची ढिसाळ धोरणे कारणीभुत आहेत. पण, हे सर्व असताना त्यावर विरोधकांकडून रान पेटवले जात नाही. सत्ताधारी पक्षांकडून केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आरोपाला उत्तरे देत आहेत. वर्धा आणि अमरावतीतील सभेत त्यांनी आंतरराष्ट्रीय कारण सांगून मतदारांची दिशाभूल तर केली नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. दुसरीकडे कापूस खरेदीसाठी राज्य सरकारकडून काय उपाययोजना केली जात आहे, यावर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत. केवळ सत्ताधारी व विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत प्रचाराची मुद्दे बाजूला ठेवत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.
दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांत विदर्भातील पाच तर मराठवाड्यातील तीन मतदारसंघाचा समावेश होता. या ठिकाणी एनडीए - भाजप आणि अविभाजित शिवसेनेने 2019 मध्ये या 8 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या. भाजपने अकोला, वर्धा आणि नांदेडवर विजय मिळवला होता, तर त्याचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने बुलडाणा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली आणि परभणीमधून विजय मिळवला होता. आता भाजपमध्ये दाखल झालेल्या नवनीत राणा 2019 मध्ये अमरावतीमधून अपक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या.
गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेचसे पाणी गेले आहे. या पाच वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष झाले तर काँग्रेसमधील बरेच नेते भाजपने फोडले आहेत. त्यामुळे ही फोडाफोड जनतेला कितपत पसंत पडली आहे हे समजून येण्यासाठी या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात राज्यात आठ जागेसाठी मतदान झाले आहे. गेल्या 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत तीन टक्के मतदान कमी झाले आहे, तर दुसरीकडे 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे. त्यामुळे हा कमी झालेल्या मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये महायुतीचा फायदा होणार की महाविकास आघाडीचा हे समजून येण्यासाठी सर्वांना 4जूनची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे हा दुसऱ्या टप्प्यातील घसरलेल्या मतांचा टक्का, कोणाला देणार धक्का? याची उत्सुकता शिगेला पोहाेचली आहे.
वर्धा – 65.65% | 61.53%
अकोला - 58.9% | 60.6%
अमरावती – 60.74% | 60.76%
बुलडाणा – 58.45% | 63.6%
हिंगोली – 60.19% | 66.84%
नांदेड - 59 57% | 65.69%
परभणी – 60.5% | 63.12%
यवतमाळ-वाशीम – 57% | 61.31%
एकूण 59.63% | 63.12%
R