
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गट या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरु झाल्यानंतर अजित पवार गटात काही प्रमाणात अस्वस्थता पसरली आहे. एकत्रीकरणाची तशी कोणतीही शक्यता नसल्याचे अजित पवार यांच्या पक्षाचे नेते सूचित करीत आहेत. या चर्चेवर पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी तर अशा चर्चा जाहीरपणे केल्या जात नाहीत, असे सांगून ही शक्यता फेटाळून लावली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या गटातील अनेक नेते उमेदवारीकडे डोळे लावून बसले आहेत. अजित पवार यांच्याकडे आलेले काही नेते मुळातच केवळ तात्कालिक राजकीय फायदा बघूनच आलेले आहेत. विकासकामांसाठी निधी मिळावा याबरोबरच सरकारमधील अन्य काही पदांची लालसा आहेच पण त्याबरोबरीने स्थानिक स्वराज्य संथांच्या निवडणुकीत उमेवारी मिळेल ही अपेक्षा आहेच. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही गट एकत्र येण्याच्या प्रक्रियेला अजित पवार यांच्या गटाकडूनच नकार मिळण्याची शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमधील मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्याने स्वबळावर जाण्याची वक्तव्ये करीत आहेत. त्यामुळे महायुतीमधील अन्य घटक पक्षसुद्धा आपले स्वबळ अजमावून पाहणार आहेत. शहरी भागात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे फारसे वर्चस्व नसले तरी एकूण सदस्य संख्येच्या पंचवीस तीस टक्के हिस्सा असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात अजित पवार यांच्या पक्षाचे चांगलेच वर्चस्व आहे. पक्षाची बांधणी सत्तेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे.
शहरी मतदार जोडण्याचा प्रयत्न अनेक स्थानिक पातळीवरील नेते अजित पवार यांच्यासोबत आहेत. अशात शरद पवार यांचा गट अजित पवार यांच्या गटात विलीन झाला तर, सुरुवातीपासून अजित पवार यांच्यासोबत सुरुवातीपासून असलेले अनेक नेते नाराज होण्याची शक्यता असल्याने अजित पवार गट एकत्रीकरणावर राजी होईल की नाही याबाबत साशंकता आहे. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विशिष्ट दिनाचे औचित्य साधत विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत आहेत. हे कार्यक्रम सांस्कृतिक असले मतदारांपर्यंत जाण्याचा एक प्रयत्न आहे. विशेष म्हणजे शहरी भागात होणारे हे कार्यक्रम कदाचित शहरातील मतदारांना जोडण्याचा प्रयत्न असावा.
मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्यासह अभिनेते अशोक सराफ, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर अशा दिग्गज्जांचा सत्कार करणे. त्यानंतर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुंबईत तीन दिवसांचा भव्य कार्यक्रम घेणे, या कार्यक्रमात महाराष्ट्र दालन उभे करून शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा सांगण्याचा केलेला प्रयत्न. त्याचबरोबर राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा केलेला सत्कार अशा कार्यक्रमातून जुन्या नेत्यांशी जोडले जाण्याचा प्रयत्न हा सुद्धा राजकारण साधण्याचा उत्तम प्रयत्न होता. मात्र या सगळ्यामागे आगामी काळात होणाऱ्या निवडणुका निश्चितच नजरेसमोर आहेत. त्यामुळे एकीकडे राजकीय पातळीवर काम करत असताना त्यासाठी झटणारे कार्यकर्ते राजकीय मैदान तयार करीत आहेत. अशा वेळी दोनही गट जर एकत्र येणार असतील आणि त्यांच्या संधी कमी होणार असतील. या एकत्रीकरणाला पक्षाच्या कार्यकर्त्यांकडूनच विरोध होणार हे निश्चित आहे.
सर्वोच्च अधिकारांत वाटेकरी नकोत शरद पवार गटाचे आठ खासदार आहेत, तर अजित पवार गटाचा एक खासदार लोकसभेत आहे. जर दोन्ही गट एकत्र आले, तर केंद्रातील मंत्रिपदाची संधी कोणाला मिळेल हे उघड आहे. त्यामुळे खासदार किंवा अजित पवार यांच्या गटातील ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा ही मान्य होईल का, ही शंका आहे. शरद पवार यांच्या गटातील चार आमदार अजित पवार गटात समाविष्ट होण्याबाबत दबाव निर्माण करीत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र आताच्या परिस्थितीत हे होईल अशी शक्यता फारच कमी आहे. त्यातच नेतृत्वामधील अंतर्गत वाद होण्याची शक्यता आहे. दोन्ही गट एकत्र झाल्यास शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या पहिल्या फळीतील नेत्यांचे राजकीय अहंकार यामुळे पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुळात राष्ट्रवादीचे दोन गट झाले तेच पक्षातील वर्चस्वाच्या अधिकारासाठी.पक्षातील निर्णयाचे अधिकार कोणाकडे असावेत या संघर्षाची परिणीती पक्ष फुटण्यात झाली आहे. त्यामुळे पुन्हा आपल्याकडे असलेले पक्षाच्या सर्वोच्च अधिकारामध्ये वाटेकरी अजित पवार यांच्या गटाच्या नेत्यांना कितपत रुचेल हा प्रश्न सुद्धा या निमित्ताने निर्माण होणार आहे.त्यामुळे एका वर्तमानपत्रात शरद पवार यांच्या मुलाखतीच्या निमित्ताने सुरु झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पक्षाचे एकत्रिकरणाविषयीच्या चर्चेला अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पक्ष सत्तेवर असल्याने सत्तेचा वाटा व तिचे लाभ पदरात पडत आहेत. त्यामुळे या वाट्यात अजून लाभार्थी नको असल्याने नेते व कार्यकर्तेही या विलिनीकरणासाठी तयार नाहीत. त्यातच पक्षाने भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीत राहूनही आपला पुरोगामी चेहरा राखण्यावर भर दिलेला असल्यामुळे या वर्गाला मानणारा मतदारही पक्षाने आकृष्ट करुन ती पोकळी ही भरुन काढली आहे. म्हणजे तुर्तास तरी पक्षाला एकत्रीकरणाची गरज वाटत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.