
Mumbai News : महायुतीमधील तीन पक्षाने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एक दिलाने काम केले त्याचा फायदा झाला. त्याच दृष्टीने आता येत्या काळात व्यापक विचार करून निर्णय घ्यावेत, असा मोलाचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या मुंबईतील महायुतीच्या सर्व मंत्र्याच्या व आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना दिला होता. पुढील पाच वर्षाच्या काळात सामान्य व्यक्तीना केंद्रस्थानी ठेऊन कार्य करत रहावे.
महायुतीमधील तीन पक्षाने एकत्र मिळून काम केले तरच आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय सोपा जाणार आहे. त्यामुळे तीन पक्षांनी समन्वयाने व एकत्रित काम करण्याचा सल्ला पीएम मोदी यांनी दिला होता. मात्र, याला आठ दिवस उलटण्यापूर्वीच महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमधील काही नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वबळाचा सूर आवळला आहे.
मुंबईतील बैठकीप्रसंगी पीएम मोदी (Narendra Modi) यांनी भाजपच्या आमदारांशी भावनिक संवाद साधताना काही कठोर मते व्यक्त केली. यावेळी त्यांनी पैसा नाही तर चांगली प्रतिमा महत्वाची आहे. केवळ स्वतःच्या फायदाचा विचार न करता संपूर्ण मतदारसंघाचा विचार करा. मतदारसंघातील ग्रामीण भागात जावा त्याठिकाणी रहा, नागरिकांत मिळून मिसळून त्यांच्या समस्या सोडवा, केवळ विनाकारण फिरू नका, अशा शब्दांत पीएम मोदींनी सगळ्यांचे कान टोचले होते.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला. त्यामुळे महायुतीचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळावर लढायला हवे, असे विचार राज्यातील भाजपचे नेते करू लागले व बोलू लागले आहेत, त्यांना योग्य तो संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या सर्व मंत्र्याच्या व आमदारांच्या बैठकीत दिला होता. त्यानंतरही अशा स्वरूपाचे विधाने नेतेमंडळीकडून करण्यात येत आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत नेमके कसे लढायचे, याबाबतची भूमिका कार्यकर्त्यांनी निश्चित करायची आहे. कार्यकर्ते जो निर्णय घेतील, तो आम्ही वरिष्ठांना कळवू. मात्र, नांदेड शहर आणि जिल्ह्यात भाजपची ताकद मोठी आहे. जिथे भाजपला अधिक संधी आहे, त्या जागा कोणत्याही परिस्थितीत सोडल्या जाऊ नये, अशी माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे स्पष्ट करीत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी आगामी काळात नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.
आगामी काळात महायुतीतील घटक पक्षच आमने-सामने येतील अशीच चिन्ह दिसत आहेत. भाजप सदस्य नोंदणीची जिल्हा आढावा बैठक नांदेडमध्ये झाली. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवू असे स्पष्ट केले. देशासह राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवू. असे स्पष्ट संकेत अशोक चव्हाण यांनी दिले.
आपली ताकद शहरात आहे, जिल्ह्यात आहे. आम्ही घटक पक्षाच्या विरोधात नाही, मात्र आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला अधिकार आहे. त्यात गैर मानण्याचे काहीच कारण नाही. असे ही अशोक चव्हाण म्हणाले.
दुसरीकडे शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय आधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफ्फुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह ज्येष्ठ मंडळीने हजेरी लावली. यावेळी प्रफ्फुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काही महत्वाच्या टिप्स दिल्या. आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यात सर्वाधिक महापालिका कशा जिंकता येतील यावर त्यांनी भर देण्यास सांगितले. ज्यांना आमदारकीला संधी मिळाली नाही. त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती ही पहिली पायरी ओळखून तयारीला लागा, अशा सूचना त्यांनी केल्या. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येकाला आपली ताकद दाखवण्याची संधी आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा. निवडणुकीची तयारी करा, त्यानंतर आपण महायुतीमध्ये एकत्रित लढायचे का ताकद असलेल्या ठिकाणी स्वबळ अजमावयाचे याचा निर्णय नंतर घेण्याचे संकेत त्यांनी अप्रत्यक्षरित्या कार्यकर्त्याना दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) ग्रामीण चेहरा, अशी ओळख झाली आहे. परंतु अजित पवार यांच्या संघटनात्मक बांधणीमुळे आणि विधानसभेतील निवडणुकीतील यशामुळे मुंबईत देखील राष्ट्रवादीची ओळख निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली ताकद निर्माण केली आहे.
महापालिका निवडणुकीत मुंबईत राष्ट्रवादीचे वेगळे चित्र, असेल असा सूर पदाधिकाऱ्यांनी आवळवला होता. तोच धागा पकडत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना शहरी संघटनावर भर देण्याच्या सूचना केल्या. अजितदादांनी देखील मुंबईसह शहरी भागातील महापालिका पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
एकीकडे पीएम मोदी यांनी महायुतीमधील तीन पक्षांनी समन्वयाने व एकत्रित काम केल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय सोपा जाणार आहे, असा सल्ला दिला होता. दुसरीकडे मात्र भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपली ताकद शहरात आहे, जिल्ह्यात आहे. आम्ही घटक पक्षाच्या विरोधात नाही, मात्र आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला अधिकार आहे. त्यात गैर मानण्याचे काहीच कारण नाही, असे संघात स्वबळाची तयारी करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.