नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये विशेषतः मोठी अपेक्षा असलेल्या पंजाब आणि गोवा, उत्तराखंडमध्ये कॉंग्रेस पक्षाची झालेली धूळधाण आणि ज्या प्रकारे राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधींचे (Priyanka Gandhi) यांचे नेतृत्व सपशेल अपयशी ठरले आहेत. (Congress failed in five state assembly elections) ते पाहता कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये गांधी कुटुंबीयांविरुद्ध गांधी कुटुंबीयांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले असंतुष्ट गटाचे कॉँग्रेस नेते असा संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. यात समावेशक नेतृत्वाची मागणी पुढे येण्याची शक्यता बोलली जात आहे.
वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांना गोव्याची दिलेली जबाबदारी वगळता सर्व जुन्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या व्यवस्थापनापासून आणि प्रचारापासूनही दूरच ठेवण्यात आले होते. पंजाबमध्ये पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता गृहीत धरून राहुल गांधींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटविण्यापासून ते नवज्योतसिंग सिद्धू, चरणजितसिंग चन्नी यांच्या निवडीपर्यंत सारे निर्णय राहुल गांधींचे होते. तर, उत्तर प्रदेशची निवडणूक कॉंग्रेससाठी पूर्णपणे प्रियांका गांधी यांच्यावर केंद्रित होती. ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्याच्या धाडसी निर्णयाने कॉंग्रेसला माध्यमांमध्ये चर्चेत आणले असले तरी मतदारांना विश्वास या पक्षाला मिळवता आला नाही.
उत्तराखंडमध्ये रणदीप सुरजेवाला यांच्या खास वर्तुळातले मानले जाणारे प्रभारी देवेंद्र रावत यांचा शब्द अंतिम होता. एकंदरीत ही संपूर्ण निवडणूकच टीम राहुलची होती. पंजाब, उत्तराखंडमध्ये घटलेल्या जागांमुळे राज्यसभेतील कॉंग्रेसच्या प्रतिनिधित्वावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे या अपयशाला जबाबदार कोण या प्रश्नावर कॉंग्रेसमध्ये धुमश्चक्री सुरू होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये नेतृत्वबदलाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसमधील गोंधळाबद्दल असंतुष्ट जी-२३ गटातील कपिल सिब्बल यांच्यासारख्या नेत्यांकडून जाहीरपणे सवाल करण्यात आले होते.
त्या पार्श्वभूमीवर या पराभवाच्या विश्लेषणासाठी होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीत असंतुष्ट गट आक्रमक राहील, असे कळते. कॉँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीची आणि नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा स्वीकारावी, अशी मागणी राहुल समर्थक गटाकडून होत होती. तर, गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे पक्षाध्यक्षपद सोपविणे, कार्यकारिणीची निवडणूक घेतली जावी, हे असंतुष्ट गटाकडून सूचकपणे उपस्थित केले जाणारे मुद्दे पुन्हा चर्चेत येण्याची आणि त्यावरून गदारोळ होण्याची चिन्हे आहेत.
या वर्षा अखेर गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये तर पुढील वर्षी मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक आणि ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय, मिझोरम, नागालॅंड या राज्यांमधील विधानसभा निवडणुका आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची केंद्रातील सत्ताधारी भाजपशी थेट लढत आहे. याआधी लागोपाठच्या पराभवामुळे खचलेल्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे आणि काही नेते कॉंग्रेसला सोडचिट्ठीही देऊ शकतात, बोलले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पक्ष एकसंध ठेवण्याचे आव्हान आगामी काळात कॉंग्रेस नेतृत्वापुढे असेल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.