Eknath Shinde-Ganesh Naik Sarkarnama
ठाणे

Shinde vs Naik : नाईकांविरोधात शिंदेंनी उतरवला ठाण्याचा वाघ; नवी मुंबईत फोडणार डरकाळी

Eknath Shinde : खासदार नरेश म्हस्के यांनी नाईक यांच्या नवी मुंबईतच खासदार आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला आहे. म्हस्के यांच्या भेटी दरम्यान नवी मुंबईतील शेकडो नागरिकांनी तक्रारी दिल्या

Hrishikesh Nalagune

Thane News : भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात नुकताच जनता दरबार घेतला. नाईक नवी मुंबईतून निवडून येतात, पालघरचे पालकमंत्री आहेत. असे असतानाही त्यांनी ठाण्यात घेतलेला जनता दरबार चर्चेचा विषय ठरला होता. हा दरबार म्हणजे एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला धक्का मानला जातो.

आता या जनता दरबारला ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी त्याच स्टाईलमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. म्हस्के यांनी नाईक यांच्या नवी मुंबईतच खासदार आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला आहे. म्हस्के यांच्या भेटी दरम्यान नवी मुंबईतील शेकडो नागरिकांनी तक्रारी दिल्या, आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावर म्हस्के यांनी तिथल्या तिथे अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

मागील काही दिवसांपासून सत्ताधारी महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेत शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. शिंदे आणि शिवसेनेची कोंडी करण्याचा धडाकाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लावला आहे. त्यांच्या अनेक योजनांना स्थगिती दिली आहे. बऱ्याच प्रकल्पांची चौकशी सुरू आहे. त्याचवेळी शिंदे यांच्या राजकीय कोंडीची सुरूवात ठाण्यातूच झाली.

गणेश नाईक आणि शिंदे यांच्यामध्ये पूर्वीपासूनच विळ्या भोपळ्याचे वैर आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यात नाईक यांची प्रत्येक पातळीवर कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे दोघांमधून विस्तवही जात नाही. आता नाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आशीर्वादाने शिंदे यांना बालेकिल्ल्यातच आव्हान देण्याचे ठरवले आहे.

याचाच भाग भाजपने नाईक यांच्या नेतृत्वात ठाणे महापालिका निवडणुकीसाठीही ओन्ली भाजपचा नारा दिला आहे. त्याचवेळी पालघरचे पालक मंत्री असतानाही नाईक यांनी ठाण्यातच जनता दरबार घेण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या जनता दरबारमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. तब्बल दहा वर्षानंतर मंत्री थेट जनतेला भेटले. शेकडो तक्रारीची निवेदने त्यांना देण्यात आली.

आधी महायुतीतील तणावामुळे मंत्री नाईक यांचा जनता दरबार होणार नाही, असे महायुतीच्या नेत्यांना वाटत होते. पण नाईक यांना उत्फुर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यातून आज खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईत खासदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवून नाईक यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना प्रतिउत्तर दिले.

याशिवाय आता आगामी काळात मंत्री नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जनता दरबार घेणार असल्याचे सांगण्यात येते. शिवाय शिवसेनेचे मंत्री नवी मुंबईत येऊन जनता दरबार घेतील असे प्रतिआव्हान मंत्री भरत गोगावले यांनी दिले आहे. त्यामुळे ठाण्यातील शीतयुद्धाचा आता भडका उडाला आहे, हे निश्चित.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT