Jitendra Awhad, Eknath Shinde sarkarnama
ठाणे

Jitendra Awhad News : नमो रोजगार मेळावा म्हणजे बेरोजगारांची दिशाभूलच; ट्विटद्वारे जितेंद्र आव्हाडांचा आरोप

Pankaj Rodekar

Thane News : बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी ट्विटद्वारे टीका केली आहे. तसेच बारामतीमधील नमो रोजगार मेळावा म्हणजे सामान्य बेरोजगार तरुणांची दिशाभूलच सरकारने केल्याचा आरोपही त्यांनी त्यामध्ये केला आहे. याशिवाय अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, बारामतीला शनिवारी झालेल्या या मेळाव्यात किती लोकांना, किती पगाराच्या कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या हे सरकारने जाहीर केलेले नाही. या मेळाव्यात एकूण 400 कंपन्यांपैकी फक्त 18 कंपनी पुणे जिल्ह्याबाहेरील होत्या. त्यामध्ये सोलापूरमधील एक, सांगलीतील एक आणि मुंबईच्या एका कंपनीचा समावेश आहे. जर पुणे जिल्ह्यात खरोखर एवढे रोजगार आणि रोजगारनिमित्त लोक वास्तव्यास येणार असतील. पुणे शहराला एवढ्या लोकसंख्येचा भार उचलता येणार आहे का? याचे उत्तर सरकारकडे नाही, असेही जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 45 हजार नोकऱ्या दिल्या जाणार असल्यातरी त्यापैकी 36 हजार नोकऱ्या या ट्रेनी स्वरूपाच्या आहेत. गमतीचा भाग म्हणजे, बँका आणि एनबीएफसीमध्ये ट्रेनी भरती करताच येत नाही. महिलांना देण्यात येणाऱ्या रोजगारात 22% घट झाल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे; पण कोणत्याही कंपनीने एकूण नोकऱ्यांपैकी किती जागा महिलांसाठी, किती पुरुषांसाठी असा उल्लेख केलेला नाही.

या मेळाव्यात दिली जाणारी नोकरी किती दिवसांसाठी असेल, पगार किती असेल आणि केव्हापासून वेतन सुरू होईल, याचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही, असेही जितेंद्र आव्हाडांनी ( Jitendra Awhad) म्हटले आहे. या मेळाव्यात 400 कंपन्या सहभागी झाल्याची आवई उठवण्यात आली असली तरी फक्त 9 कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर या मेळाव्याची जाहिरात केली आहे. त्यामुळे उर्वरित 391 कंपन्या खरोखर सहभागी झाल्या होत्या, की त्यांनी फक्त दिखावा केला, याबाबत स्पष्टता येत नाही.

अनेक कंपन्या GST रजिस्टर्ड नाहीत. त्यांची कर्मचारी संख्या आताच 10 ते 15 जणांची आहे. आता ते 100 कामगार घेऊन स्वतःचे नुकसान का करून घेतील? असा साधा प्रश्न पडत असून, त्याचे उत्तर देण्यास एकही सरकारी प्रतिनिधी तयार नाही, असेही त्यांनी त्यामध्ये नमूद केले. वय वर्षे 24 ते 30 च्या लोकांच्या नोकऱ्यांमध्ये 28 टक्के घट झाली आहे, पण त्यांच्यासाठी असलेल्या नोकऱ्यांची संख्या फक्त 2000 च्या आसपास आहे. इथेच हा रोजगार मेळावा केवळ धूळफेक असल्याचेच स्पष्ट होत आहे.

एकीकडे खासगी आस्थापनांमध्ये भरतीसाठी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असतानाच सरकारी नोकऱ्यांचा अनुशेष भरण्याबाबत सरकारमधील एकही मंत्री बोलत का नाही? एकूणच, हा मेळावा म्हणजे बेरोजगार युवकांची फक्त फसवणूक नाही तर त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. याशिवाय स्टंटबाजी करून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये लोकांची मती गुंग करण्याचा प्रयत्न असला तरी आता जनता शहाणी झाली आहे. 'दोन कोटी रोजगार, बस हुई महँगाई की मार'15 लाख या सर्व भूलथापांना जनता भीक घालणार नाही, असेही आव्हाडांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT