Ajay Mishra 
ताज्या बातम्या

तुम्हाला दोन मिनिटांत वठणीवर आणतो! केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या धमकीने पडली ठिणगी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या ताफ्याने काल (ता.3) आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकरी (Farmers) आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यामागे मिश्रा यांनी दिलेली धमकी कारणीभूत ठरल्याचे समोर आले आहे. त्यांचा हा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

मिश्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे शेतकरी संतापले होते. या व्हिडीओत त्यांनी शेतकऱ्यांना दोन मिनिटांत वठणीवर आणण्याची भाषा केली होती. मिश्रा यांनी व्हिडीओत म्हटले होते की, तुम्ही माझ्यासमोर या, तुम्हाला दोन मिनिटांत मी वठणीवर आणतो. मी केवळ मंत्री अथवा खासदार आणि आमदार नाही. मला खासदार बनण्याच्या आधीपासून लोक ओळखतात. मी आव्हान स्वीकारण्यापासून कधीच पळ काढत नाही. मी आव्हान स्वीकारेन त्यादिवशी तुम्हाला केवळ पालियाच नव्हे तर लखीमपूरही सोडावे लागेल.

मिश्रा यांच्या प्रक्षोक्षक विधानांमुळेच शेतकरी संतापले होते. त्यामुळे शेतकरी त्यांच्यासमोर आंदोलन करण्यास पोचले होते. यानंतर हिंसाचार होऊन 8 जणांचा मृत्यू झाला होता. लखीमपूर खिरीतील घटनेमुळे भाजप सरकार अडचणीत आले आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतले जात आहे. पोलिसांनी लखीमपूर खिरीमध्ये जमावबंदी लागू केली आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. याचबरोबर या प्रकरणी न्यायिक चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. काल लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 4 शेतकरी आणि 4 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा काल दुपारी तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT