Cow Carcasses : भारतात शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये गाय हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. पण हीच गाय सध्या भारतात मोठा राजकारणाचा विषयही बनली आहे. एकीकडं गायीच्या वाहतुकीवरुन कथित गोरक्षकांकडून हिंसाचाराच्या अनेक घटना आजवर घडल्यात तर दुसरीकडं याच गायींच्या मृत्यूंकडं मात्र त्यांचं दुर्लक्ष होत आहे. कारण नुकताच एक अत्यंत भीषण प्रकार समोर आला आहे. कचरा टाकण्याच्या एका डंपिंग ग्राऊंडमध्ये तब्बल ५०० गायींचे मृतशरीर कचरा टाकल्याप्रमाणं अस्ताव्यवस्त पडलेलं दिसून आलं आहे. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. यावरुन आता मोठं राजकारणही पेटलं आहे. या प्रकारानंतर स्थानिक प्रशासनाला तर प्रश्न विचारलेच जात आहेत. पण त्याचबरोबर केवळ गायींच्या तस्करीवरुन लोकांचे जीव घेणाऱ्या कथित गोरक्षकांचं या प्रकाराकडं दुर्लक्ष कसं काय झालं? असा सवालही विचारला जात आहे. येत्या काळात यावरुन मोठं वादंग निर्माण होण्याची चिन्ह आहेत.
राजस्थानातील जैसलमेर शहरापासून ७ किमी अंतरावरील रामगढ रोडवर नगरपरिषदेच्या कचरा डंपिंग यार्डवर हा प्रकार दिसून आला आहे. इथला जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात मोठ्या प्रमाणावर मृत गायींचे शव हे इतरत्र पडलेले दिसत आहेत. हे मृतावशेष पूर्णतः सडलेल्या अवस्थेत आहेत. यामुळं या संपूर्ण भागामध्ये प्रचंड दुर्गंधी देखील पसरली आहे. स्थानिकांचं म्हणणं आहे की, हे एक दोन दिवसांत झालेलं नाही तर अनेक दिवसांपासून मृत गायींचे शरीर इथं पडलेले आहेत. मृत पशूंच्या अवशेषांचे वैज्ञानिक पद्धतीनं विल्हेवाट लावण्याची इथं व्यवस्था नाही. त्यामुळं इथं अनेक काळापासून गायींचे मृतदेह फेकले गेले आणि त्यामुळं सध्या इथली परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे.
या ठिकाणचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही गोसेवकांनी या ठिकाणी भेटही दिली. पण इथली परिस्थिती इतकी भीषण होती की तिथं पाच मिनिटंही उभं राहणं शक्य नव्हतं. चारही बाजूंना सडत असलेले मृत गायींचे अवशेष पाहून या गोरक्षकांनी सांगितलं की, बऱ्याच दिवसापासून प्रशासनाला याची माहिती देण्यात आली होती. पण कुठलीही ठोस कारवाई त्यांनी केली नाही. एका गोसेवकानं म्हटलं की, समाजात गायीला मातेचा दर्जा दिला जातो. तिथंच अशा प्रकारचं दृश्य हे अत्यंत वेदनादायक आणि लाजिरवाणं आहे. व्यासपीठावरुन गोसेवाची खूप भाषण ठोकली जातात पण प्रत्यक्षात जमिनीवरील स्थिती वेगळीच आहे.
हे प्रकरण तापायला लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली असून जिल्हाधिकारी अनुपमा जोरवाल यांनी या संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे. नगर परिषद आयुक्त लजपाल सिंह सोढा यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. प्रशासनानं सांगितलं की, डंपिंग ग्राऊंडवरुन हे मृतावशेष हटवण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. भविष्यात असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून निगरानी व्यवस्था अधिक मजबूत केली जाणार आहे. पण स्थानिकांनी म्हटलंय की, केवळ नोटीसा धाडून उपयोग नाही जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.
दरम्यान, याप्रकरणावरुन काँग्रेसचे स्थानिक खासदार राम बेनीवाल यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. गोवंश संरक्षण आणि गोशाळांसाठी सरकारकडून दिलं जाणारं अनुदानाची अखेर खर्च कुठे होतेय? या गायी अन्न-पाण्यावाचून तडफडून मरणाशिवाय त्यांच्याकडं पर्यायचं राहिला नसेल. भाजप सरकारनं गायीच्या नावावर राजकारण करत सत्ता मिळवली. तेच भाजपवाले आज या भीषण परिस्थितीवर मौन बाळगून का आहेत? गोमाता म्हणून मोठं मोठ्या व्यासपीठांवरुन घोषणा करणारे आणि गोरक्षेच्या नावाखाली मतदान मागणारे तसंच धर्माचं राजकारण करणारे लोक आज कुठे आहेत? असा सवालही त्यांनी केला आहे.
दुसरीकडं सोशल मीडियातून कथित गोरक्षकांवरही युजर्सनं जोरदार टीका केली आहे. इतर वेळी गायीच्या तस्करीवरुन लोकांचे जीव घेणारे हे गोरक्षक आता कुठल्या बिळात लपून बसले आहेत? असा सवाल एकानं केला आहे. तर दुसऱ्या एकानं गायींच्या मृत्यूनंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसताना केवळ गोरक्षणाच्या नावाखाली राजकारण करणं योग्य नसल्याचंही अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करताना म्हटलं आहे. माध्यमांनी हिरो केलेला तो मोनू मानेसर कुठे आहे? असंही एकानं विचारलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.