Revanth Reddy Sarkarnama
देश

Revanth Reddy : तेलंगणात काँग्रेसला 'हात' देणारे रेवंथ रेड्डी आहेत तरी कोण ?

Sunil Balasaheb Dhumal

Telangana Election Result 2023 : देशातील पाचपैकी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल येऊ लागले आहेत. यात राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये स्पष्टपणे भाजप आघाडीवर आहे, तर छत्तीसगडमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. या वातावरणात तेलंगणात सत्ताधारी बीआरएस पक्षाला धूळ चारत काँग्रेसने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. निर्मितीनंतर तेलंगणात दोन टर्म मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बोलबाला होता. त्यास काँग्रेस नेते रेवंथ रेड्डींनी सुरुंग लावला आहे. त्यामुळे रेवंथ रेड्डी यांच्याबाबत देशात कुतूहल निर्माण झाले आहे.

मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून तेलंगणात काँग्रेसला निर्विवाद बहुमत मिळणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. राज्यातील ११९ पैकी ७० हून जास्त जागांवर विजय होणार असल्याचा विश्वास रेड्डी यांच्यासह काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी येणाऱ्या चेहऱ्यांमध्ये पहिले नाव रेवंथ रेड्डी यांचे घेतले जात आहे. परिणामी रेड्डी यांच्या राजकीय कारकिर्दीबाबतही उत्सुकता आहे. मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस रेड्डींना प्राधान्य का देईल, याचे उत्तर मिळणे गरजेचे आहे.

कोण आहेत रेवंथ रेड्डी ?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने रेवंथ रेड्डी यांच्याकडे तेलंगणा प्रदेशाध्यक्षपदाची जाबाबदारी दिली. त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1967 रोजी पूर्वीच्या आंध्र प्रदेशातील कोंडारेड्डी पल्ली, नगरकुर्नूल येथे झाला. रेवंतच्या वडिलांचे नाव अनुमुला नरसिंह रेड्डी आणि आईचे नाव अनुमुला रामचंद्रम्मा आहे. त्यांनी हैदराबाद येथील ए.व्ही. कॉलेज (उस्मानिया विद्यापीठ) मधून ललित कला शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर रेवंथने छापखाना सुरू केला होता.

लग्नानंतर राजकीय प्रवास

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री जयपाल रेड्डी यांच्या भाची अनुमुला गीता यांच्याशी रेवंथ यांचे 7 मे 1992 रोजी लग्न झाले. त्यांना न्यामायशा नावाची मुलगी आहे. लग्नानंतरच काँग्रेस खासदार रेवंथ यांचा खरा राजकीय प्रवास सुरू झाला. दरम्यान, ते विद्यार्थिदशेत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या आरएसएसच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित होते. 2006 मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचीही निवडणुकीत विजय मिळवला होता.

टीडीपीत प्रवेश

2007 मध्ये, ते आंध्र प्रदेश विधान परिषदेचे सदस्य झाले. या कार्यकाळात त्यांनी तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांना पाठिंबा दिला. यानंतर त्यांनी अधिकृतपणे टीडीपीत प्रवेश केला. रेवंथ यांनी 2009 मध्ये, टीडीपीच्या तिकिटावर कोडंगल मतदारसंघातून पहिली विधानसभा निवडणूक लढवली. त्यांनी पाच वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेले गुरुनाथ रेड्डी यांचा सुमारे सात हजार मतांनी पराभव केला.

काँग्रेसचे सदस्य बनले...

तेलंगणाच्या स्थापनेपूर्वी 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, रेवंथ यांनी कोडंगलमधून पुन्हा एकदा टीआरएसच्या गुरुनाथ रेड्डींचा १४ हजार मतांनी पराभव केला. यानंतर टीडीपीने रेवंथ यांना तेलंगणा विधानसभेचे नेते बनवले. मात्र, काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे उघड झाल्यानंतर 25 ऑक्टोबर 2017 रोजी टीडीपीने रेवंत यांना पदावरून काढून टाकले. यानंतर रेवंथ यांनी 31 ऑक्टोबर 2017 रोजी, काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पहिला पराभव

20 सप्टेंबर 2018 रोजी, त्यांची तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटी (TPCC) च्या तीन कार्यकारी अध्यक्षांपैकी एक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2018 च्या तेलंगणा विधानसभेत, रेवंथ यांनी कोडंगल मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवली. या वेळी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेल्या रेवंथ यांना बीआरएसच्या पटनम नरेंद्र रेड्डी यांच्याकडून पहिला पराभव पत्करावा लागला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...अन् रेवंथ खासदार झाले

विधानसभा पराभवानंतर रेवंथ यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले. 2019 च्या निवडणुकीत जिंकलेल्या तेलंगणातील काँग्रेसच्या तीन खासदारांपैकी रेवंथ यांचा समावेश आहे. मलकाजगिरी जागेवरील काँग्रेसच्या उमेदवाराने टीआरएसच्या एम राजशेखर रेड्डी यांचा 10 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

रेवंथ यांना जून २०२१ मध्ये मोठी जबाबदारी मिळाली. काँग्रेसने त्यांना तेलंगणा राज्याचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. या विधानसभा निवडणुकीत रेवंथ यांनी थेट तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात निवडणूक लढवली. कामारेड्डी विधानसभा जागेवर ही लढत आहे. येथे रेवंथ अजूनही आघाडीवर आहेत.

वादग्रस्त राजकीय व्यक्तिमत्त्व

रेवंथ यांना मे 2015 मध्ये लाचखोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. विधान परिषद निवडणुकीत टीडीपी उमेदवाराच्या बाजूने मतदान केल्याच्या स्टिंग ऑपरेशननंतर ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तेलंगणा उच्च न्यायालयाने ३० जून रोजी रेवंथला सशर्त जामीन मंजूर केला होता. गेल्या महिन्यातच तेलंगणा पोलिसांनी रेवंथ रेड्डी यांना अटक केली होती. हैदराबाद गन पार्कमध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही आव्हान दिले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT