Congress reaction on Amit Malviya removal: भाजपच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकारी टीममध्ये करण्यात आलेल्या बदलांपैकी डिजिटल आणि सोशल मीडिया विभागातील अमित मालवीय यांची उचलबांगडी हा सर्वात स्वागतार्ह बदल असल्याचा घणाघात काँग्रेस नेत्या मुमताज पटेल यांनी केला आहे.
मालवीय यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या डिजिटल यंत्रणेने काँग्रेसविरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण केले आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात अपप्रचाराची मोहीम राबवली, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपच्या नव्या टीमची घोषणा झाल्यानंतर मुमताज पटेल यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली. अमित मालवीय यांना डिजिटल आणि सोशल मीडिया विभागातून हटवण्याचे काँग्रेसने (Congress) स्वागत केले आहे.
मुमताज पटेल म्हणाल्या की, अमित मालवीय यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या डिजिटल आणि सोशल मीडिया सेलने देशभरात काँग्रेसविरोधात नकारात्मक प्रचार केला. राहुल गांधी यांच्याविरोधात कथित खोटे नरेटिव्ह तयार करण्यात आले, अफवा पसरवण्यात आल्या आणि चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.
भाजपच्या (BJP) नव्या टीमला इशारा देताना मुमताज पटेल म्हणाल्या की, पक्षासाठी प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने काम करणे वेगळी गोष्ट आहे. मात्र, मतपेढीचे राजकारण आणि द्वेष पसरवण्याची जुनीच पद्धत नव्या टीमनेही कायम ठेवली, तर देशातील जनतेला पुन्हा दिशाभूल करता येणार नाही.
डिजिटल माध्यमांवरून राजकीय प्रचाराची दिशा बदलत असताना भाजपच्या नव्या सोशल मीडिया टीमने जनतेशी अधिक जबाबदारीने संवाद साधण्याची गरज असल्याचेही त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित झाले.
अमित मालवीय हे गेल्या सुमारे 11 वर्षांपासून भाजपच्या डिजिटल आणि सोशल मीडिया यंत्रणेशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होते. भाजपच्या नव्या संघटनात्मक रचनेत त्यांची या विभागातून उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
त्यांच्या जागी छत्तीसगडमधील नेते दीपक म्हस्के यांची राष्ट्रीय सोशल मीडिया संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपच्या डिजिटल प्रचार यंत्रणेत हा महत्त्वाचा संघटनात्मक बदल मानला जात आहे. दरम्यान, अमित मालवीय यांच्यासोबत काम केलेले अनिल बलूनी यांच्याकडे राष्ट्रीय मीडिया समन्वयाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.
डिजिटल आणि सोशल मीडिया हे आता राजकीय पक्षांच्या प्रचाराचे प्रमुख माध्यम बनले आहे. विशेषतः तरुण आणि पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया रणनीती अधिक प्रभावी करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे.
जंतर-मंतरवरील जेन-झी आंदोलनानंतर युवा मतदारांच्या प्रश्नांवर आणि त्यांच्या डिजिटल संवादशैलीवर राजकीय पक्षांमध्ये नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या सोशल मीडिया टीममध्ये करण्यात आलेला बदल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
काँग्रेसने मात्र अमित मालवीय यांच्या उचलबांगडीचे स्वागत करत भाजपच्या डिजिटल प्रचाराच्या पद्धतीवर थेट निशाणा साधला आहे. आगामी काळात भाजपची नवी सोशल मीडिया टीम तरुण मतदारांशी कसा संवाद साधते आणि काँग्रेसच्या आरोपांना कशा पद्धतीने उत्तर देते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.