Amit Shah, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Amit Shah On Rahul Gandhi : तेरा वेळा 'लाँचिंग' केलं पण 'फेल' गेलं; अमित शाहांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत नवेदन करत नाहीत, असा आरोप करत विरोधकांनी अविश्वास ठाराव प्रस्ताव मांडला आहे. या ठरावावर दोन दिवसांपासून सभागृहात तुफान चर्चा सुरू आहे. यात सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री अमित शाह खिंड लढवत आहेत. पंतप्रधानांच्या कामावर विरोधकांचा नसला तरी देशातील गरीब लोकांचा विश्वास आहे, असे म्हणत शाहांनी देशात राबवलेल्या सर्व योजनांची यादीच सांगितली. यावेळी त्यांनी काँग्रेसला टोले लगावत नाव न घेता खासदार राहुल गांधींवरही निशाणा साधला. यावेळी भाजपने जल्लोष केला तर काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाली. (Latest Political News)

राहुल गांधीवर निशाणा

राहुल गांधी बुंदेलखंड दौऱ्यादरम्यान २०१३ मध्ये एका गरीब महिलेच्या घरी जेवल्याचा किस्सा शाहांनी सभागृहात सांगतिला. यावेळी ते म्हणाले, "सभागृहात अशी एक व्यक्ती आहे त्यांना तब्बल तेरा वेळा राजकाणात लाँच करण्याचा प्रयत्न केला. मात्र तेराही वेळा हा प्रयत्न फेल गेला. त्यांचे एक लाँचिंग माझ्या समोरच झालेले आहे. त्यापूर्वी त्यांनी बुंदेलखंड येथे कलावती नावाच्या महिलेच्या घरी जेवण केले होते. जेवणानंतर त्यांनी सभागृहात त्यांनी गरिबीचे ह्रदयद्रावक शब्दात वर्णन केले. यानंतर त्यांचे सरकार सहा वर्षे होते. मात्र त्या कलवतीनचे काय झाले? त्या महिलेच्या जेवणाचा, घराचा, रोजगाराचा प्रश्न मिटला की नाही, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. त्या कलावतीलाही नरेंद्र मोदींच्या काळात सर्व काही मिळाले. ती कलावतीही मोदींनाच साथ देत आहे."

कोरोना काळात राजकारण

कोरोना काळात विरोधकांनी राजकारण करण्याची एकही संधी सोडली नसल्याचा हल्लाबोलही शाहांनी यावेळी केला. कोरोनाला रोखण्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली लसीकरण बनवण्यात आले. त्याचे १३० कोटी जनतेला डोस देवून देशातून कोरोनाला हद्दपार केले. या काळात खासदार राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाकडून मात्र मोदींनी तयार केलेली लस घेऊ नका, असा प्रचार केला. जनतेने मात्र त्यांच्यावर विश्वास न ठेवता लस घेऊन देशाला वाचवल्याचेही शाह म्हणाले. लॉकडाऊन लागले तर गरिबांची उपमार होईल असे सागिंतले गेले. मोदींनी मात्र कडक निर्णय घेऊन लॉकडाऊनही केले आणि घरी बसलेल्या लोकांची भूकही भागवली. त्यांना आजही अन्नपुरवठा केला जात असल्याचा दावाही शाहांनी केला.

मोदी दीनमित्र

देशात मोदींची ओळख दीन मित्र म्हणून असल्याचे सांगून देशातील सर्व घटकांना योग्य सन्मान मिळाल्याचे अमित शाहांनी सांगितले. ते म्हणाले, "मोदींच्या नऊ वर्षांच्या काळात दोन राष्ट्रपदी निवडण्याची संधी भाजपला मिळाली. यात दलित आणि आदीवासी समाजाला प्राधान्य देण्यात आले. हे सरकार गरिबांसाठी काम करणारे आहे. त्यामुळे अविश्वास तुम्हाला आहे, देशातील जनतेला नाही. माझा विश्वास आहे की २०२४ मध्येही मोदी पंतप्रधान होणार आहेत. "

देशाची अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर असणार

देशातील अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकाची होणार असल्याचा दावा शाह यांनी केला. त्यांनी सांगितले की, "अटलबिहारी वाजपेयी लोकांतून आलेले नेते होते. सहा वर्षे त्यांनी सरकार चालवले. देशाची अर्थव्यवस्था त्यांनी १५ व्या क्रमांकावरून ११ व्या क्रमांकावर आणली. त्यांच्यानंतर अर्थशास्त्रज्ञ पंतप्रधान बनले. त्यांनी ११ व्या वरून आपली अर्थव्यवस्था १२ व्या क्रमांकावर आणली नाही हे आपले भाग्य आहे."

काँग्रेसनंतर अर्थव्यवस्था सुधारेल की नाही, याबाबत देशात शंकेचे वातावरण होते. यावर बोलतनात शाह म्हणाले, "मनमोहन सिंगांच्या काळात सर्व ग्राफ उलटे होते, सर्व पॅरमीटरची धज्जी उडाली होती. मात्र गरीबाच्या घरी जन्मलेला आणि सरपंचापासून राजकारणात मोठा झालेल्या या व्यक्तीने आपली अर्थव्यवस्था ११ क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली. आता मला विश्वास आहे की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील आणि २०२७ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या क्रमांकावर असेल. हे मी नाही तर आयएमएपचे सर्व सर्वेक्षणातून स्पष्ट झालेले आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT