Swami Prasad Maurya
Swami Prasad Maurya Sarkarnama
देश

भाजप सोडताच बड्या नेत्याला मोठा झटका! 24 तासांतच निघालं अटक वॉरंट

सरकारनामा ब्युरो

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) वातावरण चांगलेच तापले आहे. ओबीसींचे मातब्बर नेते व मंत्री स्वामीप्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी काल (ता.11) राजीनामा दिला होता. मौर्य यांनी भाजपला धक्का दिल्यानंतर 24 तासांतच त्यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते. भाजप सोडणे त्यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.

भाजपच्या (BJP) उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बडे नेते दिल्लीत डेरेदाखल आहेत. काल (ता.11) काही तासांतच भाजपच्या मंत्र्यांसह पाच आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांनी भाजपला रामराम केला असून, ते 14 जानेवारीला समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यानंतर आणखी एक मंत्री आणि चार आमदारांनी भाजपला राजीनामा दिला आहे.

राजीनामा दिल्यानंतर 24 तासांतच मौर्य अडचणीत आले आहेत. दोन धर्मांत तेढ निर्माण करणारे भाषण केल्याप्रकरणी मौर्य यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. हे प्रकरण 2014 मधील आहे. या प्रकरणी आज त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. त्यांना 24 जानेवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर काल (ता.11) त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती, भगवती सागर आणि विनय शाक्य या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. हे चौघेही मौर्य यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मौर्य हे ओबीसी नेते असल्याने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मौर्य यांच्यानंतर इतर नेतेही पक्ष सोडण्याच्या मार्गावर असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

मागील काही दिवसांपासून मौर्य हे अखिलेश यादव यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मागील निवडणुकीत भाजपला जातीच्या राजकारणाने सत्तेत पोहचवल्याचे मानले जाते. दलित, मागासवर्गाच्या मतदानाचा टक्का अधिक असल्याने अखिलेश यादव यांनीही आता या जातींकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे भाजपमधील या नेत्यांनाही आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच मौर्य यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT