New Delhi News : मुख्यमंत्री पद गमवावे लागलेल्या अन् तब्बल 156 दिवस तुरूंगवास भोगावे लागलेल्या दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल,उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 23 जणांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात निर्दोष ठरल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच ललकारलं आहे.
अरविंद केजरीवाल यांच्यावर मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातच दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच त्यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनाही तब्बल 530 तुरुंगात काढावे लागले. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दिल्लीची गेल्या निवडणुकीत बहुमतात आलेली सत्ता गमावण्याची वेळ आली.
या सगळ्या घडामोडींनंतर आता केजरीवाल यांच्यासह 23 जणांच्या निर्दोष मुक्ततेनंतर आता दिल्लीत पुन्हा एकदा आप विरुद्ध भाजप सामना रंगण्याची शक्यता आहे. याची पहिलीच झलक केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत दाखवून दिले. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आव्हान दिलं.
दिल्लीत तुम्ही निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा निवडून आल्यास राजीनामा देईन, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसेच निर्दोष मुक्तता झाल्यानंतर केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी हे दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचं संपूर्ण षडयंत्र रचलं. त्यांनी पूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले, मोदी आणि शाह या दोघांनी मिळून हे षडयंत्र रचलं. या षडयंत्राच्या माध्यमातूनच आम आदमी पार्टीला संपवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत ते आम्हाला पराभूत करु शकत नव्हते, दिल्लीची जनता आमच्यावर खुश आहे हे ते पाहत होते. जनतेला माहिती आहे केजरीवाल इमानदार आहेत. त्यामुळं त्यांनी केजरीवालच्या इमानदारीवरच हल्ले करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
अरविंद केजरीवाल म्हणाले, मोदीजी आणि अमित शाह यांनी स्वतंत्र भारतातील सर्वात राजकीय षडयंत्र रचलं. त्यांनी आम आदमी पार्टीला संपवण्यासाठी आमच्या पक्षाच्या सर्वात मोठ्या पाच नेत्यांना तुरुंगात टाकलं. विद्यमान मुख्यमंत्र्याला घरातून फरफटत नेऊन तुरुंगात टाकलं, सहा महिने तुरुंगात ठेवलं गेलं. जे आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं.
अरविंद केजरीवाल म्हणाले, मी आयुष्यात इमानदारी कमावली आहे. पण त्यांना माझ्या याच इमानदारीवर आघात करायचा होता. काहीजण म्हणतात की, तुरुंगातून आल्यानंतर केजरीवाल गप्प झाले, केजरीवाल गायब झाले. पण मी काही नेता नाही,असं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी ठणकावून सांगितलं.
पुढे ते असंही म्हणाले की, मला जेव्हा कोणी बेईमान म्हणतं, तेव्हा मला फरक पडतो. माझ्या कुटुंबावर जेव्हा केव्हा बोललं जातं, तेव्हा फरक पडतो. यामुळे जेव्हा मी संपूर्ण देशासमोर निर्दोष होऊन येईन, तेव्हाच बोलेन, असं विधानही त्यांनी यावेळी केलं.
अरविंद केजरीवाल म्हणाले, आम्ही नेहमी सांगत होतो की, सत्याचा विजय होतो. आम्हाला देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. ज्या न्यायमूर्तींनी आमच्यासोबत न्याय केला, त्यांचे धन्यवाद... सत्याचा विजय झाला, मी नेहमी सांगायचो भगवान आमच्यासोबत आहे.
दिल्लीतील कोर्टाच्या निकालाविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं (सीबीआयनं) हायकोर्टात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाचा निकाल हा सीबीआयसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे केजरीवाल,सिसोदिया यांच्यासह 23 जणांच्या निर्दोषत्वाला आता सीबीआय उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. त्यामुळे हायकोर्ट काय निर्णय बदलणार की कायम ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.