Indian judiciary debate : आम आमदी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद्र केजरीवाल यांनी सोमवारी टोकाचा निर्णय घेतला आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणाच्या दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीला न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर स्वत: किंवा वकिलांमार्फत हजर न राहण्याची घोषणा त्यांनी केली आहे. केजरीवाल यांनी एकप्रकारे सुनावणीवरच बहिष्कार टाकला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीतील सत्र न्यायालयाने केजरीवालांसह अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. याविरोधात सीबीआयने दिल्ली हायकोर्टात दाद मागितली आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुरू आहे. पण न्यायाधीश शर्मा यांनी या केसच्या सुनावणीतून बाहेर पडावे, अशी मागणी केजरीवाल यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी स्वत: कोर्टात आपली बाजू मांडली होती. पण त्यांची ही मागणी शर्मा यांनी फेटाळून लावली आहे.
केजरीवालांचा सत्याग्रह
न्यायाधीश शर्मा याच आता केसची सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केजरीवालांनी मोठं पाऊल उचललं आहे. अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सोशल मीडियातून याबाबतची घोषणा केली. केजरीवाल यांनी न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांना चारपानी पत्र लिहिले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, हा मुद्दा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस्टचा आहे. न्यायाधीश शर्मा यांची दोन्ही मुले केंद्र सरकारच्या वकिलांच्या पॅनेलमध्ये आहेत.
केंद्र सरकारच्या पॅनेलमध्ये ७०० हून अधिक वकील आहेत. पण सर्वाधिक केस ज्या वकिलांना दिल्या जातात, त्यामध्ये न्यायाधीश शर्मा यांच्या मुलांचा समावेश आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे सरकारी वकिलांना केस देतात. अशावेळी न्यायाधीश शर्मा यांच्या मुलांना केस देणारी व्यक्ती जेव्हा सरकारची बाजू मांडण्यासाठी त्यांच्यासमोर येईल, त्यावेळी त्या मला न्याय देऊ शकतात का, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांना माझा वैयक्तिक विरोध नाही. एखाद्या मोठ्या वकिलाच्या माध्यमातून केस लढविण्याचा सोपा पर्याय माझ्यासमोर होता. पण मी अंतरात्म्याचा आवाज ऐकला. महात्मा गांधी यांच्या मार्गाने सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्यायही आपल्यासमोर असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
भविष्यात माझ्याशी किंवा आम आदमी पक्षाशी संबंधित कोणतेही प्रकरण न्यायाधीश शर्मा यांच्या खंडपीठासमोर गेले आणि त्यावेळी तुषार मेहता, केंद्र सरकार किंवा भाजप विरोधात नसेल तर आम्ही आमची केस जोरकसेपणे लढू, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. आपण न्यायाधीश शर्मा आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान करतो. याच न्यायपालिकेने मला न्याय दिला आहे. लोकांच्या मनात न्यायपालिकेविषयी अधिक चांगली भावना निर्माण व्हावी, यासाठीच आपण हा निर्णय घेतल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.