AIUDF chief Badruddin Ajmal, CM Himanta Biswa Sarma Sarkarnama
देश

Himanta Biswa Sarma News : निवडणुकीआधीच दुसरं लग्न करा, नाहीतर जेलमध्ये! मुख्यमंत्र्यांचा खासदाराला इशारा

Rajanand More

Assam News : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma News) यांनी खासदार बदरुद्दीन अजमल यांना थेट इशारा दिला आहे. जर दुसरे लग्न करायचे असेलल तर निवडणुकीआधीच करायला हवे, नाहीतर तुरुंगात जाण्यासाठी तयार राहावे, असे विधान सरमा यांनी केले आहे. आसाममध्ये लोकसभा निवडणुकीनंतर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बहुविवाह बेकायदेशीर ठरणार आहे. यापार्श्वभूमीवर सरमा यांनी खासदारालाच हा इशारा दिला आहे.

बदरुद्दीन अजमल (AIUDF chief Badruddin Ajmal) हे आसाममधील धुबरी लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघाचे खासदार आहे. ते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. नुकतेच त्यांनी एका सभेत काँग्रेसच्या (Congress) उमेदवारावर टीका केली होती. ते म्हणाले होते की, काँग्रेसचे लोक मी म्हातारा झाल्याचे म्हणतात. पण मी पुन्हा लग्न करू शकतो, एवढी ताकद माझ्यामध्ये आहे. मुख्यमंत्र्यांना पटले नाही तरी मी असे करू शकतो, असे म्हणत अजमल यांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला होता.

सरमा यांनी खासदार अजमल यांच्या या विधानावर पलटवार केला. ते म्हणाले, त्यांनी आताच लग्न करायला हवे. निवडणुकीनंतर आसाममध्ये समान नागरीक संहिता (Uniform Civil Code) लागू होईल. त्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केले तर त्यांना अटक केली जाईल. त्यांनी आता आम्हाला निमंत्रण दिलं तर मीही लग्नाला जाईल. कारण सध्या ते बेकायदेशीर ठरत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजमल यांना एक पत्नी आहे. त्यांना वाटले तर ते दुसरे, तिसरे लग्न करू शकतात. पण हे निवडणुकीआधीच. निवडणुकीनंतर एकापेक्षा जास्त विवाह करता येणार नाहीत. त्याचा आराखडा तयार आहे. त्याअंतर्गत सर्व नागरिकांसाठी एकच कायदा असले. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्कक घेणे अशा व्यक्तिगत बाबी धर्मावर आधारित राहणार नाहीत, असेही सरमा यांनी सांगितले.

सरमा यांनी काही दिवसांपुर्वीच आपले सरकार समान नागरिक संहितेचा कायदा आणणार असल्याचे जाहीर केले आहे. मागील महिन्यात उत्तराखंड विधानसभेत याबाब कायदा मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर सरमा यांनीही त्यासाठी आग्रही भूमिका घेत त्यादिशेने वेगाने काम सुरू केले आहे. दरम्यान, आसामध्ये तीन टप्प्यांत लोकसभेची निवडणूक आहे. तर निकाल चार जूनला आहे.

SCROLL FOR NEXT