Assam Violence | West Karbi Anglong | Sarkarnama
देश

Assam Violence : सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाचा वाद चिघळला, संतप्त जमावाने भाजप नेत्याचं घर पेटवलं; हिंसाचारात CRPF जवान अन् पोलिसही जखमी

BJP Leader House Attack : घरावरील हल्ल्यानंतर भाजप नेते तुळीराम रोंगहांग यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आमचा या उपोषणाला आमचा विरोध नाही. परंतु, चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे.

Jagdish Patil

Assam Violence : आसाममधील वेस्ट कार्बी आंगलोंग जिल्ह्यात बेकायदा अतिक्रमण हटवण्यासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे सोमवारी (ता.22) मोठा हिंसाचार उफाळला. यावेळी संतप्त जमावाने भाजप नेते तुळीराम रोंगहांग यांच्या घराला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली.

तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केला. या हिंसाचारात काही नागरिकांसह पोलीस आणि CRPF जवान देखील जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात CRPF आणि पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

आसामध्ये डोंगराळ भागात असलेल्या वेस्ट कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कार्बी आंगलोंग स्वायत्त परिषदेच्या पीजीआर आणि व्हिजीआर जमिनीवर इतर समुदायाच्या नागरिकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप तिथल्या स्थानिकांनी केला आहे. या सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासाठी मागील दोन आठवड्यांपासून ९ आंदोलक फेलंग्पी भागात उपोषणाला बसले होते.

या उपोषणकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत इतर ठिकाणी नेल्यामुळे इतर आंदोलकांनी दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली. संतप्त जमावाने यबिहारी आणि नेपाळी नागरिकांवर हल्ले केले. इतकंच नव्हे तर कार्बी आंगलोंग स्वायत्त परिषदेचे मुख्य कार्यकारी सदस्य व भाजप नेते तुळीराम रोंगहांग यांच्या घरावर घरावर दगडफेक करत थेट त्यांच्या घराला आग लावली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

दरम्यान, घरावरील हल्ल्यानंतर भाजप नेते तुळीराम रोंगहांग यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आमचा या उपोषणाला आमचा विरोध नाही. परंतु, चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. मी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावलं आहे. तर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली, असा गैरसमज आंदोलकांचा झाल्यामुळे हिंसाचार उफाळला.'

मात्र, पोलीस उपोषण करणाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. ते म्हणाले, मागील पंधरा दिवसांपासून उपोषण सुरू असल्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती. म्हणून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येत होते. त्यावेळी संतप्त आंदोलकांनी जाळपोळ व दगडफेक सुरू केली.

दरम्यान, एकीकडे पीजीआर व व्हिजीआर जमिनीवर बिहारी नोनिया समुदायातील नागरिकांनी अतिक्रमण केले असून ते १९८३ कुटुंब तिथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय या समुदायाने अतिक्रमण हटवू नये यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले आहे.

तसंच त्यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे. तर दुरीकडे कार्बी आंगलोंग स्वायत्त परिषदेच्या पीजीआर आणि व्हिजीआर जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी दोन आठवड्यांपासून या भागात उपोषण सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT